संदेशखाली घटनांच्या तपासानंतर राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचा धक्कादायक निष्कर्ष
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पश्चिम बंगालमधील संदेशखाली येथे आदीवासी, दलित आणि मागासवर्गीय महिलांवर होत असलेल्या लैंगिक अत्याचारांच्या पाठीशी राजकीय कारणही आहे. या समाजातील महिलांनी 2021 च्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेस पक्षाला मतदान केले नाही, अशा संशयावरुन या भागातील बाहुबली नेता शहाजहान शेख आणि त्याचे गुंड यांनी महिलांवर घृणित अत्याचार केले आहेत, असा निष्कर्ष राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाने काढला आहे. तसेच या गरीब महिलांना रोजगार हमी योजनेतून मिळणारा रोजगारही हिसकावून घेण्यात आला आहे, अशीही तक्रार अनेक महिलांनी केल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.
या आयोगाच्या प्रतिनिधी मंडळाने दोन दिवसांपूर्वी संदेशखालीचा दौरा केला होता. त्या दौऱ्यात या मंडळाने स्थानिक महिलांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी या महिलांनी शहाजहान शेख आणि त्याचे गुंड यांच्या विरोधात अनेक तक्रारी केल्या. तसेच आपल्यावरील अत्याचारांची माहिती दिली.
रोजगारही बळकावला
दलित, आदीवासी आणि मागासवर्गीय समाजघटकांमधील अनेक महिला गरीबीमुळे मनरेगा या रोजगार हमी योजनेत काम करतात. तथापि, त्यांनी कष्ट करुन मिळविलेला रोजगारही तृणमूल काँग्रेसच्या गुंड कार्यकर्त्यांकडून बळकावला जातो, अशी तक्रार अनेक महिलांनी आयोगाकडे केली. अत्याचार, लैंगिक शोषण, रोजगार बळकाविणे, जमीनी आणि घरे बळकाविणे आदी तक्रारी प्रामुख्याने हिंदू समाजातील दलित, आदीवासी आणि मागासवर्गीय महिलांनी केल्या आहेत. प्रशासन त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत आहे, असेही निरीक्षण आयोगाने नोंदविले आहे.
हजारोंच्या जमीनी हिसकाविल्या
आपल्यावर होणाऱ्या अत्याचारांसंबंधीच्या तक्रारी अनेक महिलांनी अनेकदा स्थानिक प्रशासनाच्या विविध विभागांकडे केल्या. तथापि शहाजहान शेख आणि त्याचे गुंड हे राज्यातील सत्ताधारी राजकीय पक्षाशी संबंधित असल्याने प्रशासनाने या तक्रारींकडे सरसकट दुर्लक्ष चालविले, असेही निरीक्षण आयोगाने नोंदविले आहे. गुंडांनी एक हजारांहून अधिक आदीवासींच्या जमीनी बळकाविल्या आहेत, असा निष्कर्ष आयोगाने काढला असून कठोर कारवाईची सूचना केली जाणार आहे.