काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आरोप : ब्रिटनमधून मोदी सरकारवर टीका
वृत्तसंस्था/ कॅम्ब्रिज
भारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्याची अनुमती देणाऱया संस्थांवर ‘नियोजनबद्ध हल्ला’ होत असल्याचा आरोप काँगेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. चर्चेला बाधित करण्यात आल्याने ‘सरकारच्या धोरणांना गोपनीय पद्धतीने प्रभावित किंवा नियंत्रित करणारे प्रभावशाली लोक किंवा संस्था’ देशात संवादाची नवी व्याखा निर्माण करू पाहत असल्याचा दावा राहुल यांनी केला आहे. ‘कॅम्ब्रिज विद्यापीठा’च्या कॉर्पस क्रिस्टी कॉलेजमध्ये आयोजित ‘इंडिया ऍट 75’ कार्यक्रमात बोलताना राहुल यांनी विद्यार्थ्यांच्या विशेषकरून भारतीय वंशाच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली आहेत.
आमच्यासाठी भारत तेव्हा ‘जिवंत’ असतो, जेव्हा भारत बोलतो. भारत गप्प बसल्यावर तो निर्जीव ठरतो. भारताला बोलण्याची अनुमती देणाऱया संस्थांवर नियोजनपूर्वक हल्ले केले जात असल्याचे मी पाहतोय. यात संसद, निवडणूक व्यवस्था, लोकशाहीच्या मूलभूत रचनेवर एका संघटनेकडून कब्जा केला जातोय असे राहुल म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताचा एक असा दृष्टीकोन तयार करत आहेत, जो देशाच्या सर्व हिस्स्यांच्या लोकसंख्येला सामील करत नाही. हा प्रकार चुकीचा असून भारताच्या विचाराच्या विरोधात असल्याचा दावा राहुल यांनी केला.
भारतीय प्रसारमाध्यमांवर एका विशिष्ट गटाचा कब्जा आहे. भारतीय प्रसारमाध्यमांना सरकारला समर्थन देणारे काही मोठे उद्योगपती नियंत्रित करत आहेत. याचमुळे आम्ही एका राजकीय पक्षाशी लढत असून भारत राष्ट्रावर कब्जा करणाऱयांच्या विरोधात लढत आहोत आणि हा लढा सोपा नाही. ही लढाई अवघड ठरणार असली तरीही आमचे प्रयत्न सुरूच आहेत असे उद्गार त्यांनी काढले आहेत.
भारताच्या मूलभूत स्वरुपाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि पंतप्रधान मोदी धक्का पोहोचवत आहेत. ध्रूवीकरणाचे राजकारण करताना 20 कोटी लोकांना वेगळे पाडले जाते, हा प्रकार देशासाठी धोकादायक आहे. पंतप्रधान मोदींनी काही गोष्टी चांगल्या केल्या असल्या तरीही भारताच्या विचारावरील हल्ला अस्वीकारार्ह असल्याचा दावा राहुल यांनी केला. भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त कॅम्ब्रिज विद्यापीठाच्या कॉर्पस क्रिस्टी कॉलेजमध्ये स्कुल ऑफ ह्युमॅनिटीज अँड सोशल सायन्सकडून राहुल यांच्यासोबत संवादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.