विद्यार्थ्यांना सावधानतेचा इशारा ः परराष्ट्र मंत्रालयाकडून गाईडलाईन्स जारी
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारताने कॅनडात जाणाऱया विद्यार्थ्यांना सावधानतेचा इशारा दिला आहे. कॅनडात भारतविरोधी कारवायांमध्ये तीव्र वाढ झाली असून द्वेष पसरवला जात आहे. या पार्श्वभूमीवर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने विद्यार्थ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच भारतीयांविरोधातील गुह्यांचा तपास करून गुन्हेगारांवर कारवाई करण्यात यावी, अशी विनंती परराष्ट्र मंत्रालयाकडून कॅनडा प्रशासनाकडे करण्यात आली आहे. कॅनडातील द्वेषपूर्ण गुन्हे, सांप्रदायिक हिंसाचार आणि भारतविरोधी कारवायांवर परराष्ट्र मंत्रालयाची करडी नजर आहे.
गेल्या काही दिवसांपासून कॅनडात भारतीयांविरुद्धच्या वाढत्या गुन्हय़ांवर परराष्ट्र मंत्रालयाने चिंता व्यक्त केली आहे. कॅनडात भारतीय विद्यार्थ्यांवर हल्ले वाढले आहेत. मंगळवारी ऑन्टारियोमध्ये झालेल्या गोळीबाळात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सतविंदर सिंग असे या घटनेत मृत झालेल्या 28 वषीय तरुणाचे नाव आहे. सतविंदर भारतातून कॅनडामध्ये शिक्षणासाठी गेला होता. सतविंदरच्या मृत्यूनंतर कॅनडातील विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी कॅनडामधील नागरिकांसाठी गाईडलाईन्स जारी करत सावधगिरी बाळगण्याची आणि सतर्क राहण्याची सूचना केली आहे. कॅनडामध्ये राहणारे भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. तसेच जे लोक प्रवासासाठी अथवा शिक्षणासाठी कॅनडामध्ये जाण्याच्या तयारीत आहेत, त्यांनी योग्य खबरदारी घेत सतर्कता बाळगावी, असे निवेदन परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्ध केले आहे.
कॅनडातील भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांनी ओटावातील भारतीय मोहिमेत अथवा टोरँटो आणि व्हँक्मयुव्हरमधील वाणिज्य दूतावासात नोंदणी करावी, असे आवाहन भारत सरकारकडून करण्यात आले आहे. या नोंदणीमुळे आणीबाणीच्या काळात भारतीय उच्चायुक्त किंवा दूतावासाला भारतीय नागरिकांशी संपर्क साधणे सोयीस्कर होईल, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.