ऑनलाईन टीम/भारत
विधान परिषदेच्या निवडणुकीत (MLC Election) मतदान करण्यापासून रोखण्यासाठी महाविकास आघाडीकडून mahavikas aghadi) दबाव तंत्राचा वापर करण्यात येत आहे. मी भाजपला मतदान करू नये, यासाठी मविआने मला अटक करण्यासाठी मुंबई (mumbai) आणि अमरावती पोलिसांना माझ्या मुंबईतील घरी पाठवले, असा आरोप आमदार रवी राणा यांनी केला आहे. राणा यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून प्रसारित केलेल्या व्हिडीओतून हा आरोप करण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राणा दाम्पत्य विरूद्ध राज्य सरकार हा संघर्ष संपूर्ण राज्याने पाहिला आहे. भाजपचे सहयोगी आमदार रवी राणा यांच्या विरोधात जामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे. अमरावतीचे महापालिका आयुक्त यांच्यावरील शाईफेक प्रकरणात हे वॉरंट काढण्यात आलं आहे. दरम्यान विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदान करण्यापासून रोखण्यासाठी महाविकास आघाडीकडून दबाव तंत्राचा वापर करण्यात येत आहे. मी भाजपला मतदान करू नये, यासाठी मविआने मला अटक करण्यासाठी मुंबई आणि अमरावती पोलिसांना माझ्या मुंबईतील घरी पाठवले, असा आरोप आमदार रवी राणा यांनी केला आहे.
रवी राणा म्हणाले की, ”राजापेठ येथील उड्डाणपुलावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवल्यानंतर महापालिका आयुक्तांवर शाईफेक करण्यात आली होती. याप्रकरणी आपल्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमरावती आणि मुंबई पोलिसांचे एक पथक मला अटक करण्यासाठी मुंबईतील खार येथील निवासस्थानी पोहोचले, पण आपण त्या ठिकाणी उपस्थित नसल्याने ते मला अटक करू शकले नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दबावतंत्राचा हा एक भाग असून आपण यावर कायदेशीर पद्धतीने उत्तर देणार आहोत.”
रवी राणा यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जामीनपात्र वॉरंट जारी केला आहे. राजापेठ पोलीस शनिवारी रवी राणा यांच्या मुंबईतील घरी वॉरंट घेऊन पोहोचले होते. त्यावेळी रवी राणा तेथे उपस्थित नव्हते. कारण राणा दाम्पत्य सध्या राजस्थानच्या दौऱ्यावर आहेत.