ऑनलाईन टीम / मुंबई :
खा. नवनीत राणा (navneet rana) आणि आ. रवी राणा (ravi rana) या दाम्पत्यावर सरकारविरोधी वक्तव्य करत आव्हान देण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्यांच्यावर 124 अ हा राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेवर भाजप आ. अतुल भातखळकर (atul bhatkhalkar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राणा दाम्पत्यावर न केलेल्या गोष्टींबद्दल राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा मुळात घटनाद्रोह आहे, असे भातखळकर यांनी म्हटले आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीवेळी भातखळकर बोलत होते. ते म्हणाले, राजद्रोहाचा गुन्हा हा अजामीनपात्र असतो. त्याला जामीन मिळू शकत नाही. त्यामुळे राणा दाम्पत्यावर न केलेल्या गोष्टींबद्दलही हा गुन्हा दाखल करण्यात आला. राजकीय दृष्टय़ा कोणी डोईजड होत असेल तर त्याला पोलिसांमार्फत त्रास द्यायचा. हे महाविनाश आघाडीचं सरकार आहे. आधी ऍक्शन मग सेक्शन अशी या सरकारची भूमिका आहे. ते सातत्याने घटनाद्रोह करणाऱ्या गोष्टी करत आहेत. आणीबाणी घोषित न करता उघड उघड पोलिसांच्या बळाचा वापर करुन कायदे वाकवण्याचे काम सुरू आहे.
आपण गुणरत्न सदावर्तेंच पाहिलं तर त्यांच्यावरही रोज नवे गुन्हे दाखल होत आहेत. धनंजय मुंडेंवर ज्या महिलेने आरोप केले, ती महिला तुरुंगात जाते. जनता हे उघडय़ा डोळ्याने बघत आहे. जनता राज्य सरकारला विशेषत: शिवसेनेला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.