एक काळ असा होता, जेव्हा माणूस हवेत उडेल किंवा पाण्यावर तरंगत राहील, असे म्हटले तर ती परिकल्पना किंवा काल्पनिक कथा असल्याचे मानले जात होते. विमान आणि जहाजाचा शोध लागला तेव्हा माणूस हवेत आरामात उडायला लागला आणि जहाजामुळे पाण्याचा स्पर्शही न होता त्यावर तरंगायला लागला. लोखंडी रुळावरून वेगाने घसरत जाणारी रेल्वे आली आणि तिने मुंबईसारख्या प्रचंड मोठय़ा शहरातील वाहतुकीची मोठी समस्या दूर केली. लोकल रेल्वे नसती तर मुंबईच्या रस्त्यावर गर्दीचा आणखी महापूर ओसंडला असता आणि काय घडले असते याची नुसती कल्पनादेखील अंगावर शहारे आणते. विमान, रेल्वे, जहाज हे सगळे विज्ञान आणि मानवी बुद्धिमत्तेचे संशोधन. आता यापुढे जाऊन मेट्रो रेल्वे किंवा तत्सम गाडय़ा चालकाशिवाय सुयोग्य रीतीने चालायला लागणार आहेत. तांत्रिक प्रगतीमुळे अपघात कमी होतील आणि अचूकता वाढीस लागेल. फक्त महानगरातच नव्हे तर खेडय़ापाडय़ातील शेतीच्या बांधावरदेखील राखणदाराची गरज राहणार नाही. ड्रोनचा वापर करून शेतीची देखरेख करता येईल. ही कल्पनादेखील एखाद्या विज्ञानकथेमध्येच शोभून दिसली असती. सध्या अणुऊर्जेसह अत्यंत धोकादायक खाणप्रकल्पांमध्ये माणसे काम करीत आहेत. तिथे त्यांच्या जीवाला धोका आहे. अशा ठिकाणी रोबो काम करू शकतात. अगदी शौचालये, गटारी साफ करण्यापासून तत्सम घाण वाटणाऱया कामात माणसांना हात घालण्याची गरज नसेल, तिथेही रोबो काम करू लागतील. ही आणि याहूनही मोठी क्रांती होऊ घातली आहे ती 5 जी स्पेक्ट्रम अर्थात ध्वनिलहरिंमुळे. ‘स्पेक्ट्रम’ किंवा ध्वनीलहरिंचा लिलाव ही सरकारी प्रक्रिया असली तरी सर्वसामान्य नागरिकाच्या जीवनावर तिचा परिणाम होणार आहे. यावर्षाच्या ऑक्टोबर महिन्यापासून सध्या सुरू असलेली 4 जी यंत्रणा 5 जीमध्ये रुपांतरित व्हायला लागेल, त्यानंतर लक्षणीय बदल होतील. ‘व्हर्चुअल रिएलिटी’ किंवा ‘आर्टिफिशल इंटलिजन्स’मुळे महानगरी जीवन आमूलाग्र बदलेल. भावनिक आणि श्रद्धाळू लोक ही सृष्टी चालवणारी एक शक्ती आहे, परमेश्वर तिचे नाव, असे मानतात. त्यातील तथ्य ज्याच्या त्याच्या अनुभवावर सोडले पाहिजे. तथापि, अदृश्य शक्तीकडून चालवली जाणारी अजस्त्र यंत्रे पाहिल्यानंतर ही शक्ती मानवदेखील आत्मसात करीत आहे, असे म्हटले तर फार अतिशयोक्तीचे होणार नाही. सात दिवस चाललेल्या 5 जी ध्वनिलहरिंच्या लिलावामध्ये रिलायन्स उद्योग समुहाच्या ‘जिओ’ने बाजी मारली. 88 हजार 78 कोटी रुपयांना त्यांनी 24740 मेगाहर्ट्ज ध्वनिलहरी खरेदी केल्या. दुसऱया क्रमांकावर सुनील मित्तल यांची भारती एअरटेल ही कंपनी आहे. या कंपनीने 43 हजार 84 कोटी रूपयांना 19867 मेगाहर्ट्जची खरेदी केली. आणि तिसऱया स्थानावर राहिलेल्या व्होडाफोनने 18 हजार 784 कोटी रूपयांना 2,668 मेगाहर्ट्ज स्पेक्ट्रम खरेदी केले. केंद्र सरकारला या लिलावामधून दीड लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल मिळाला आहे. 4 जीच्या लिलावामधून 1 लाख 9 हजार कोटी रुपयांचा लाभ झाला होता. 4जी आणि 5 जी मध्ये प्रचंड गुणात्मक फरक आहे. 4 जी नेटवर्कमध्ये एका पॉईंटहून दुसऱया पॉईंटकडे माहितीचे हस्तांतरण करण्यासाठी 50 मिलिसेकंद लागतात. तर 5 जी नेटवर्कमध्ये अवघ्या एका मिलिसेकंदाचा कालावधी त्याला लागतो. या प्रक्रियेला ‘लेटन्सी’ म्हणतात. ही गती अविश्वसनीय आहे. 4जी नेटवर्कमध्ये एका लोकेशनवर अनेक ‘डिव्हाईस’ जोडणे बऱयाचदा दुरापास्त होते. 5 जी मध्ये एका चौरस किलोमीटरमध्ये दहा लाख ‘डिव्हाईस’ सांभाळण्याची ताकद आहे. ही सगळी तांत्रिक माहिती सर्वसामान्यांचे डोळे फिरवणारी आहे. मात्र, त्यातून नागरिकांच्या व्यक्तिगत माहितीचे भांडार संबंधित कंपनीला खुले होणार आहे. सध्या, इंटरनेटवरून, गूगलद्वारे आपण एखाद्या वस्तूची जाहिरात पाहिली किंवा माहिती घेतली की ‘आर्टिफिशल इंटलिजन्स’मुळे त्याच पद्धतीची माहिती आपल्याला सातत्याने पुरवली जाते. तीच गोष्ट आपण मोबाईल सेटवरून पाहत असलेल्या चित्रपट किंवा एखाद्या कार्यक्रमाचीही. याचा अर्थ, तुमची आवडनिवड नोंदवली गेलेली असते. सर्वसामान्य माणूस माहितीच्या महाजालामुळे प्रचंड मोठय़ा व्यापारी शक्तीच्या तावडीत अलगद सापडलेला आहेच. 5 जी नेटवर्क त्यात भरच घालेल. त्याची व्याप्ती वाढवेल. मात्र, तंत्रज्ञानामुळे माणसाच्या जगण्यावरचे स्वातंत्र्यदेखील हिरावले जाईल की काय अशी स्थिती येत्या काळात अधिक प्रकर्षाने जाणवू लागेल. सरकारला मोठय़ा प्रमाणावर महसूल उपलब्ध होत असल्याने संबंधित कंपन्या नागरिकांच्या ‘प्रायव्हसी’वर किती आक्रमण करीत आहेत याच्याशी देणेघेणे नसेल. ‘हाय बँड’, ‘मिड बँड’ आणि ‘लो बँड’ अशा कोणत्याही प्रकारात आणि क्षेत्रात ग्राहक असेल तरीही त्याची माहिती केंद्रीभूत केली जाणे अगदीच अशक्मय नाही. ध्वनिलहरिंचा लिलाव ही खरे तर सरकारी प्रक्रिया आहे. तरीही तिचा सामान्य नागरिकांवर परिणाम होणार यात शंका नाही. येत्या काळात, इंटरनेट वापराचे दर वाढू शकतात. मोबाईलचा ‘रिचार्ज’ करणे महाग होऊ शकते. पर्वतीय प्रदेशासह आणि दुर्गम भागात 5 जीमुळे इंटरनेट सेवा पोचणार असल्याने त्यात वाढच होणार, यात शंका नाही. मोबाईलवर चित्रपट पाहणे, विविध गेम खेळणे, संगीत ऐकणे या गोष्टी अधिक सुलभ होणार असल्याने 5 जी भारतात क्रांती घडवणार, हे उघड आहे. खरे पाहता, शास्त्रीय संशोधन, तंत्रज्ञान, वैद्यकीय सेवांमध्ये 5 जीचा अधिकाधिक वापर फलदायी ठरू शकतो. असे असले तरी विंदा करंदीकरांच्या भाषेत ‘विज्ञान ज्ञान देई, निर्मी नवी किमया, निर्मी न प्रेम-शांती, त्याला इलाज नाही’ अशी स्थिती उद्भवणार, असे दिसते.
Previous Articleसेन्सेक्स-निफ्टीत तेजीची झुळूक
Next Article नॅन्सी पेलोसींच्या तैवान दौऱयाला प्रारंभ
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.