ऑस्टेलियाची पुन्हा भारतावर आघाडी
वृत्तसंस्था/ मुंबई
पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत ऑस्ट्रेलियन महिला संघाने भारतावर 2-1 अशी आघाडी मिळविली आहे. बुधवारी येथे झालेल्या या मालिकेतील तिसऱया सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 21 धावांनी पराभव केला. भारतीय संघातील शेफाली वर्माचे अर्धशतक वाया गेले.
या मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय नोंदवून आघाडी घेतली होती. त्यानंतर भारताने दुसरा सामना सुपर ओव्हरमध्ये जिंकून बरोबरी साधली होती. बुधवारच्या तिसऱया सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 20 षटकात 8 बाद 172 धावा जमविल्या होत्या. पण त्यानंतर भारताने 20 षटकात 7 बाद 151 धावांपर्यंत मजल मारल्याने त्यांना हा सामना 21 धावांनी गमवावा लागला. या मालिकेतील आता दोन सामने बाकी आहेत.
ऑस्ट्रेलियाच्या डावात कर्णधार हिली पहिल्याच षटकातील चौथ्या चेंडूवर पायचीत झाली. तिने 1 धाव जमविली. रेणुकासिंग ठाकुरने तिचा बळी मिळविला. अंजली सर्वानीने मॅकग्राचा एका धावेवर त्रिफळा उडविला. त्यानंतर बेथ मुनी आणि एलिस पेरी या जोडीने तिसऱया गडय़ासाठी 64 धावांची भर घातली. देविका वैद्यने मुनीला वर्माकरवी झेलबाद केले. तिने 22 चेंडूत 4 चौकारांसह 30 धावा जमविल्या. एका बाजूने एलिस पेरीने चिवट फलंदाजी करत संघाला सुस्थितीत नेण्याचा प्रयत्न केला. देविका वैद्यने गार्डनरला 7 धावांवर यष्टीचीत केले. अंजली सर्वानीने पेरीला यादवकडे झेल देण्यास भाग पाडले. पेरीने 47 चेंडूत 3 षटकार आणि 9 चौकारांसह 75 धावा जमविल्या. ती पाचव्या गडय़ाच्या रूपात 17 व्या षटकात बाद झाली. सुदरलँड, कॅरे या तळाच्या फलंदाज झटपट बाद झाल्या. ऑस्ट्रेलियाच्या डावामध्ये 6 षटकार आणि 19 चौकार नोंदविले गेले. भारतातर्फे रेणुकासिंग ठाकुर, अंजली सर्वानी, दीप्ती शर्मा आणि देविका वैद्य यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. ऑस्ट्रेलियाने पॉवर प्ले अखेर 6 षटकात 2 बाद 43 धावांपर्यंत मजल मारली होती. पेरी आणि हॅरिस यांनी 55 धावांची भागीदारी केल्याने ऑस्ट्रेलियाला 172 धावांपर्यंत मजल मारता आली.
भारताच्या डावाला चांगली सुरुवात झाली नाही. डावातील तिसऱया षटकातच संघाची धावसंख्या 15 असताना सलामीची फलंदाज स्मृती मानधना ब्राऊनच्या गोलंदाजीवर झेलबाद झाली. तिने केवळ 1 धाव जमविली. शेफाली वर्मा आणि रॉड्रिग्ज यांनी संघाचा डाव बऱयापैकी सावरला. भारताने पॉवर प्ले अखेर 6 षटकात 2 बाद 33 धावांपर्यंत मजल मारली होती. शेफाली वर्माने कॅरेच्या एका षटकात 3 सलग चौकार ठोकले. त्यानंतर तिने गार्डनरच्या पुढील षटकात सलग 2 षटकार मारले. ब्राऊनने रॉड्रिग्जला पायचीत केले. तिने 11 चेंडूत 3 चौकारांसह 16 धावा जमविल्या. भारताने 10 षटकाअखेर 2 बाद 79 धावांपर्यंत मजल मारली होती. शेफाली वर्मा आणि कर्णधार हरमनप्रित कौर यांनी 73 धावांची भागीदारी केली. 14 व्या षटकात शेफाली वर्मा कॅरेच्या गोलंदाजीवर झेलबाद झाली. तिने 41 चेंडूत 3 षटकार आणि 6 चौकारांसह 52 धावा जमविल्या. शेफालीने आपले अर्धशतक 39 चेंडूत पूर्ण केले. तर भारताचे शतक 12.5 षटकात फलकावर लागले. देविका वैद्य आणि रिचा घोष यांना अधिक धावा जमविता आल्या नाहीत. गार्डनरने भारताच्या या दोन फलंदाजांना बाद केले. कर्णधार हरमनप्रित कौरने 27 चेंडूत 6 चौकारांसह 37 धावा जमविल्या. ती सहाव्या गडय़ाच्या रूपात बाद झाली. राधा यादव 4 धावांवर धावचीत झाली. 15 षटकाअखेर भारताने 5 बाद 113 धावांपर्यंत मजल मारली होती. शेवटच्या 5 षटकात भारताला 60 धावांची जरुरी होती. पण कर्णधार कौर बाद झाल्याने भारताचे आव्हान संपुष्टात आले. हरमनप्रित कौरने सर्वाधिक टी-20 सामने खेळले असून तिचा हा 140 वा सामना होता. भारताच्या डावात 3 षटकार आणि 18 चौकार नोंदविले गेले. ऑस्ट्रेलियातर्फे ब्राऊन आणि गार्डनर यांनी प्रत्येकी 2 तर स्कूट आणि कॅरे यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया 20 षटकात 8 बाद 172 (एलिस पेरी 75, बेथ मुनी 30, ग्रेस हॅरिस 41, रेणुकासिंग 2-24, अंजली सर्वानी 2-34, दीप्ती शर्मा 2-40, देविका वैद्य 2-22), भारत 20 षटकात 7 बाद 151 (शेफाली वर्मा 52, रॉड्रिग्ज 16, हरमनप्रित कौर 37, दीप्ती शर्मा नाबाद 25, ब्राऊन 2-19, गार्डनर 2-21, स्कूट 1-23, कॅरे 1-44).