भारताचा 6 गडय़ांनी विजय, मालिकेत 2-0 आघाडी, सामनावीर जडेजाचे 7 बळी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सामनावीर रवींद जडेजाने ऑस्ट्रेलियन फलंदाजांचे फिरकीवरील तंत्र आणि गोंधळलेली मानसिनकता पूर्णपणे उघडी पाडल्यानंतर भारताने दुसऱया कसोटीतही तिसऱया दिवशीच ऑस्ट्रेलियावर 6 गडय़ांनी विजय मिळवित चार सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आणि बॉर्डर-गावसकर ट्रॉफी आपल्याकडेच राखण्यात यश मिळविले. सामन्यात 10 बळी टिपणाऱया जडेजाने ऑस्ट्रेलियाचे सात फलंदाज 42 धावांत गारद करत आजवरची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. याशिवाय रविचंद्रन अश्विनने 59 धावांत 3 बळी मिळवित त्याला पूरक साथ दिली. या विजयामुळे भारताचे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतील स्थानही निश्चित होण्यास मदत झाली आहे. भारताचा हा ऑस्ट्रेलियावरील सर्व फॉरमॅटमध्ये मिळून 100 वा विजय आहे.
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 263 धावा जमविल्यानंतर भारताचा डाव 262 धावांत आटोपल्याने कांगारूंना केवळ एका धावेची आघाडी मिळाली. मात्र दुसऱया डावात ऑस्ट्रेलियन फलंदाजांना चुकीच्या शॉट सिलेक्शनची किंमत मोजावी लागली. त्याचा लाभ उठवत जडेजा व अश्विन यांनी ऑस्ट्रेलियाचा दुसऱया डावात केवळ 31.1 षटकांत 113 धावांत धुव्वा उडविला. एकाच सत्रात पूर्ण डाव उखडण्याची त्यांची ही या मालिकेतील दुसरी वेळ आहे. नागपूरमधील पहिल्या कसोटीतही त्यांच्यावर अशीच नामुष्की आली होती. त्यांचे शेवटचे 9 गडी केवळ 52 धावांत बाद झाले.
भारताला विजयासाठी 115 धावांचे माफक आव्हान होते. पण भारतालाही त्यासाठी संघर्ष करावा लागला. केएल राहुलचा (1) खराब फॉर्म या डावातही कायम राहिला. 26.4 षटकांत भारताने 4 बाद 118 धावा जमवित विजय साकार केला. शंभरावी कसोटी खेळणाऱया चेतेश्वर पुजाराने संयमी खेळ करीत श्रीकर भरतच्या साथीने विजय मिळवून दिला. पुजाराने 74 चेंडूत नाबाद 31 तर भरतने 22 चेंडूत नाबाद 23 धावा फटकावल्या. या दोघांनी अभेद्य 30 धावांची भागीदारी केली. या मालिकेतील तिसरा सामना 27 फेब्रुवारीपासून इंदोरमध्ये खेळविली जाईल.
1 बाद 61 या धावसंख्येवरून ऑस्ट्रेलियाने दुसऱया डावाची सुरुवात केली. जडेजाचा आर्मबॉल ऑस्ट्रेलियासाठी सर्वात घातक चेंडू ठरला. त्यांचे एकूण पाच फलंदाज खाली राहिलेल्या चेंडूंना स्वीप करताना बाद झाले. ऑस्ट्रेलियाने उर्वरित नऊ गडी केवळ 52 धावांत गमविले. त्यात खेळपट्टीपेक्षा फिरकीची अनामिक भीती हेच त्यांच्या पतनाचे मुख्य कारण होते, स्टीव्ह स्मिथ, ऍलेक्स कॅरे, मॅट रेनशॉ, कमिन्स, मॅट कुहनमन हे सर्व स्लॉग स्वीपच्या चुकीच्या फटक्यावर बाद झाले तर अन्य काही जणांनी मधल्या किंवा लेगस्टंपच्या रोखाने टाकलेल्या चेंडूवर अशक्यप्राय रिव्हर्स स्वीप करताना बाद झाले. चेंडू खाली राहत असल्याने ते त्रिफळाचीत झाले किंवा पायचीत तरी झाले.
अश्विननेही जडेजाला परिपूर्ण साथ दिल्याने ऑस्ट्रेलियाच्या आठ फलंदाजांना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. आदल्या दिवशीची जोडी ट्रव्हिस हेड (43) व मार्नस लाबुशेन (35) यांनीच दुहेरी धावसंख्या गाठली. त्यांनी प्रतिहल्ला करीत काही वेळ भारतीय गोलंदाजांना थोपवण्यात यश मिळविले. पण हेड अश्विनच्या ऑफब्रेकवर बाद झाल्यानंतर त्यांचा डाव साफ कोलमडला. हेडचा झेल यष्टिरक्षक भरतने टिपला. हेडने 46 चेंडूंच्या खेळीत 6 चौकार, एक षटकार मारला तर लाबुशेनला जडेजाने त्रिफळाचीत केले. त्याने 50 चेंडूत 5 चौकार मारले. पुरेसा बाऊन्स नसताना सरळ येणाऱया किंवा स्लाइडर्स चेंडूवर स्वीप किंवा रिव्हर्स स्वीप मारणे फलंदाजांसाठी धोकादायक ठरते आणि ही चूक त्यांच्या प्रमुख फलंदाजांनी केली. अशा खेळपट्टीवर प्रंटफूटवर बचावात्मक फटका खेळणे जास्त सुरक्षित असते, अशामुळे सिलिपॉईंट किंवा शॉर्टलेगवर झेल उडण्याची शक्यताही कमी होते. आत्मविश्वासाने खेळणारा लाबुशेन प्रंटऐवजी बॅकफूटवर खेळला. पण चेंडू खाली राहिला आणि त्याचा त्रिफळा उडवून गेला. जखमी वॉर्नरच्या जागी आलेल्या बदली रेनशॉकडे अशा खेळपट्टीवर खेळण्याचे तंत्र नाही हे स्पष्ट झाल्यानंतर अश्विनने त्याला पायचीत पकडले. पीटर हँड्स्कॉम्बला मात्र उत्कृष्ट चेंडू पडला. जडेजाने चेंडूला किंचित उंची देत पीटरला पुढे खेचले. पण चेंडू बाहेरच्या बाजूने वळला आणि बॅटची कड घेऊन कोहलीच्या हातात जाऊन विसावला. पीटरला खातेही उघडता आले नाही. कर्णधार कमिन्सचा स्लॉग स्वीप हा निराशेतून मारलेला होता तर कुहनमन जडेजाचा सातवा बळी ठरला.
रोहितचा हल्ला
दुसऱया डावात राहुल पुन्हा एकदा स्वस्तात बाद झाला. रोहितने लो बाऊन्स असणाऱया खेळपट्टीवर कसे खेळावे, याचा दाखलाच दाखवून दिला. त्याने ऑस्ट्रेलियन स्पिनर्सवर हल्ला चढवित 20 चेंडूत 31 धावा चोपल्या. पण तो दुर्दैवाने धावचीत झाला. थोडीशी उंची दिलेल्या चेंडूवर तो पुढे सरसावत येत फटके मारत होता. अन्य चेंडू तो बॅकफूटवर खेळत होता. नंतर कोहलीने पुजारासमवेत 30 धावांची भर घातल्यानंतर मर्फीच्या गोलदांजीवर तो यष्टिचीत झाला. त्याने 31 चेंडूत 20 धावा काढल्या. श्रेयस अय्यरही 10 चेंडूत 12 धावा काढून बाद झाल्यानंतर भरत व पुजारा यांनी 27 व्या षटकात विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. नाथन लियॉननं 2 व मर्फीने एक बळी मिळविला.
संक्षिप्त धावफलक ः ऑस्ट्रेलिया प.डाव 263, भारत प.डाव 262, ऑस्ट्रेलिया दु.डाव 31.1 षटकांत सर्व बाद 113 ः हेड 43 (46 चेंडूत 6 चौकार, 1 षटकार), लाबुशेन 35 (50 चेंडूत 5 चौकार), स्मिथ 9, कॅरे 7, लियॉन 8, कमिन्स 0. गोलंदाजी ः जडेजा 7-42, अश्विन 4-59.
भारत दु.डाव 26.4 षटकांत 4 बाद 118 ः रोहित शर्मा 31 (20 चेंडूत 3 चौकार, 2 षटकार), राहुल 1, पुजारा नाबाद 31 (74 चेंडूत 4 चौकार), कोहली 20 (31 चेंडूत 3 चौकार), श्रेयस अय्यर 12 (10 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), एस. भरत नाबाद 23 (22 चेंडूत 3 चौकार, 1 षटकार). गोलंदाजी ः लियॉन 2-49, मर्फी 1-22, कुहनमन 0-38.
कोहलीच्या जलद 25000 आंतरराष्ट्रीय धावा
किंग कोहलीने आणखी एका विक्रमाला गवसणी घातली असून आंतरराष्ट्रीय प्रिकेटमध्ये 25000 धावांचा टप्पा गाठला आहे. सर्वात जलद त्याने हा टप्पा गाठला असून हा टप्पा गाठणारा तो सहावा फलंदाज आहे. दुसऱया डावात 8 धावा जमविल्यानंतर त्याने हा विक्रम नोंदवला. त्याचा हा 492 वा आंतरराष्ट्रीय सामना असून त्याच्या आता 25012 धावा झाल्या आहेत. या विक्रमानंतर बीसीसीआयने त्याचे अभिनंदन केले. भारताच्या सचिन तेंडुलकरने (664 सामन्यात 34357 धावा) सर्वाधिक धावा जमविल्या असून लंकेचा कुमार संगकारा (594 सामन्यात 28016), दुसऱया, महेला जयवर्धने (652 सामन्यात 25957), तिसऱया ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंग (560 सामन्यात 27483) चौथ्या, दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू जॅक कॅलिस (519 सामन्यात 25534) पाचव्या स्थानावर आहेत. कोहलीने सर्वात कमी म्हणजे 549 व्या डावात हा टप्पा पूर्ण केला. तेंडुलकरला यासाठी 577 तर पाँटिंगला 588 डाव लागले होते. 25000 हून अधिक धावा जमविताना कोहलीने 53 हून अधिक धावांची सरासरी राखली आहे. कसोटीमध्ये कोहलीने 106 सामन्यांत 8195 तर 271 वनडेत 12809 आणि 115 टी-20 सामन्यात 4008 धावा जमविल्या आहेत.
बॉर्डर, हेडन यांचीऑस्ट्रेलियावर टीका
ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज खेळाडू ऍलन बॉर्डर आणि मॅथ्यू हेडन यांनी भारताविरुद्धच्या दिल्ली कसोटीत ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव ज्या प्रकारे गडगडला त्याबद्दल पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील संघाला फटकारले आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ घाबरल्याप्रमाणे वाटला. संघ ज्या प्रकारे खेळला ते पाहून मी निराश झालो आहे, मला धक्का बसला आहे आणि रागही आला आहे. कोणीही तेथे टिकून राहून चांगला बचावात्मक खेळ करून धावांचा ओघ कायम ठेवण्याचा प्रयत्न केला नाही. ते फक्त प्रत्येक चेंडूवर स्वीप, रिव्हर्स स्वीप खेळून बाद होत गेले, असे बॉर्डरनी म्हटले आहे.
कठीण खेळपट्टीवर खेळताना धावा काढण्याचे पर्याय काय आहेत हे शोधून काढावे लागतात आणि काही वेळ क्रीजवर टिकून राहून फलंदाजी करावी लागते, असे मत माजी सलामीवीर हेडन यांनी व्यक्त केले. फॉक्स क्रिकेटवर समालोचन करताना हेडन म्हणाले, ‘मी नुकतेच जे पाहिले त्यावर माझा विश्वास बसत नव्हता. ते जागतिक दर्जाचे खेळाडू आहेत. त्यांनी शनिवारच्या काही षटकांमध्ये खूप चांगला खेळ करताना चांगला बचाव केला. परंतु रविवारी जे पाहायला मिळाले ते भयानक होते’.
फलंदाज नेहमीच्या पद्धतीने खेळले नाहीत ः कमिन्स
स्वीप आणि रिव्हर्स स्वीपसारखे भरपूर जोखमीचे फटके हाणणे हे प्रत्येक फलंदाजासाठी सोपे नसते आणि कदाचित त्याभरात काही फलंदाज त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने खेळले नाहीत, अशी प्रतिक्रिया ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने भारताविरुद्ध दारुण पराभव स्वीकारावा लागल्यानंतर व्यक्त केली. सातत्याने चेंडू खाली राहत असताना आडव्या बॅटने खेळण्याच्या भरात उपकर्णधार स्टीव्ह स्मिथसह पाच ऑस्ट्रेलियन फलंदाज बाद झाले.
मला वाटते की, भारताने खरोखरच चांगली गोलंदाजी केली. या खेळपट्टीवर खेळणे सोपे नाही. परंतु कदाचित काही खेळाडू त्यांच्या नेहमीच्या खेळण्याच्या पद्धतींपासून दूर जाऊन खेळले. प्रत्येक फलंदाजची स्वतःची अशी खेळण्याची पद्धत असते. मला वाटत नाही की, कोणतीही एकच पद्धत सर्वांना सोयीस्कर ठरू शकते. दुर्दैवाने आमच्यापैकी काही जण आडव्या बॅटने फटके मारताना बाद झाले, ही आमची खेळण्याची पसंतीची पद्धत नव्हे, असे कमिन्स पुढे म्हणाला.