सीमाभागातील विद्यार्थ्यांना मोफत-सवलतीत प्रवेश, विविध कोर्स उपलब्ध
प्रतिनिधी /बेळगाव
शिवाजी विद्यापीठाला 60 वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त सीमाभागातील 865 गावांतील विद्यार्थ्यांना मोफत आणि सवलतीच्या दरात विविध अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला जाणार आहे. विद्यापीठाने ही महत्त्वाकांक्षी योजना राबविली असून सीमाभागातील होतकरू विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र प्रमुख डॉ. भारती पाटील यांनी केले आहे.
शिवाजी विद्यापीठाने सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी मोफत अभ्यासक्रम सुरू केला आहे. या अभ्यासक्रमाबाबत मार्गदर्शन शिबिर मंगळवारी खानापूर रोड येथील संत तुकाराम महाराज सांस्कृतिक भवनमध्ये पार पडले. यावेळी त्या बोलत होत्या.
पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. प्रा. आनंद मेणसे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी शिवाजी विद्यापीठातून आलेल्या प्राध्यापक प्रतिनिधींनी अभ्यासक्रमांबाबत सविस्तर माहिती विशद केली. शिवाजी विद्यापीठाने सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी बीए, बीकॉम, एमएस्सी, एमए, एमटेक, बीई आदी अभ्यासक्रमांसाठी मोफत प्रवेश देण्याचे ठरविले आहे. इतर कोर्सवर 25 टक्के सवलत असणार आहे. विशेष म्हणजे सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रमात 10 टक्के राखीव जागा ठेवल्या जाणार आहेत. याबरोबरच वसतिगृहात मोफत राहण्याची सोयदेखील केली जाणार आहे. व इतर विनाअनुदानित अभ्यासक्रमांना सवलतीच्या दरात प्रवेश दिला जाणार आहे. सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी असून विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घेऊन आपला अभ्यासक्रम पूर्ण करावा, असे आवाहन शिवाजी विद्यापीठातून आलेल्या प्रतिनिधींनी केले. यावेळी दीपक दळवी, मनोहर किणेकर, मालोजी अष्टेकर, प्रा. नंदकुमार मोरे, प्रा. अवनीश पाटील, नवनाथ कोळेकर, प्रवीण प्रभू, जगन कराडे आदी उपस्थित होते. याबरोबरच शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.