जिल्हा व पोलीस प्रशासनाच्या मदतीने कारवाई
प्रतिनिधी/कोल्हापूर
अवनी संस्थेने शुक्रवारी करवीर तालुक्यातील एका गावात होणारा बालविवाह रोखण्यात यश मिळवले. बालविवाह रोखण्यासाठी अवनि संस्था संचलित जागर प्रकल्प अंतर्गत कोल्हापूर जिह्यांमध्ये बाल संरक्षण समिती स्थापन काम केले जात आहे.
शुक्रवारी जागर प्रकल्प समन्वयक प्रमोद पाटील यांना करवीर तालुक्यातील एका गावामध्ये 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह होणार असल्याची माहिती मिळाली. त्यांनी ही माहिती संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांना दिली. त्यानंतर त्यांनी वेगाने हालचाली करत जिल्हा प्रशासनाला माहिती देत बालविवाह रोखण्यासाठी सांगितले. करवीर पोलिस ठाण्याचे आयपीएस गोकुल राज यांनी कॉन्स्टेबल रणजित देसाई, प्रियांका साबळे, प्रमोद पाटील, सिद्धांत घोरपडे, किरण पाटील यांनी मुलीच्या घरी भेट देऊन पाहणी केली.
त्यावेळी मुलीचे लग्नग्न होणार होते पण पोलीस व अवनि संस्थेची टीम येणार असल्याचे समजल्यानंतर एक अक्षता टाकून लग्न थांबविण्यात आले होते. अवनी आणि पोलिसांच्या टीमने मुलीला व पालकांना बालविवाह प्रतिबंधक कायद्याविषयी माहिती देऊन मुलीला बालकल्याण समिती समोर सादर केले. या कारवाईत आयपीएस गोकुल राज, जिल्हा महिला बालविकास अधिकारी शिल्पा पाटील, सागर दाते, बालकल्याण समिती सदस्या ऍड. दीलशाद मुजावर, पोलिस पाटील धनश्री मेढे व ग्रामसेवक एम.जी.पाटील यांचे सहकार्य लाभले.