हिंदू जनजागृती समितीतर्फे शाळांमध्ये जनजागृती
प्रतिनिधी/ बेळगाव
राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्राची अस्मिता आहे. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी रोजी ध्वजारोहण केले जाते. मात्र यावषी 13 ऑगस्टपासून 15 ऑगस्टपर्यंत ध्वजारोहण होत आहे. ही कौतुकास्पद बाब आहे. मात्र यावेळी राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही याची खबरदारी घ्या, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्यावतीने अनेक शाळांतील मुख्याध्यापकांना आणि शिक्षणाधिकाऱयांना करण्यात आली आहे.
प्लास्टीकचा ध्वज घेणे टाळावे. कोणीही विक्री करत असल्यास त्याची माहिती जिल्हाधिकाऱयांना देवून त्यांच्यावर कारवाई करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन देखील करण्यात आले आहे. ध्वजारोहण झाल्यानंतर कोणीही गटारी किंवा इतर ठिकाणी राष्ट्रध्वज फेकून देवू नये. यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. याचबरोबर प्रत्येकाने याची खबरदारी घ्यावी, असेही या निवेदनात म्हटले आहे. गेल्या दोन वर्षांपासून तसेच ऑनलाईन पद्धतीने तिरंगा ध्वजाच्या रंगातील मास्क विक्री होत असल्याचे आढळून आले आहे. तेंव्हा हे मास्कही घेवू नये. राष्ट्रध्वजाची पावित्र्यता राखणे महत्वाचे आहे. राष्ट्रीय मानचिन्ह किंवा राष्ट्रध्वजाचा आदर राखणे तसेच अवमानाला प्रतिबंध करण्यासाठी कायदा आहे. त्या कायद्यानुसार कोणीही ध्वजाचा अवमान करत असतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाते. तेंव्हा याबाबतदेखील जनजागृती करावी, असेही या निवेदनात म्हटले आहे. यावेळी हिंदू जनजागृतीचे कार्यकर्ते आणि महिला उपस्थित होत्या.