टीव्ही चॅनेल्ससाठी सरकारची नियमावली ः प्रक्षोभक दावे-भाषा न वापरण्याचा सल्ला
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
युपेन-रशिया युद्ध आणि दिल्ली दंगलीच्या टेलिव्हिजन कव्हरेजवर आक्षेप घेत केंद्र सरकारने शनिवारी वृत्तवाहिन्यांसाठी काही नियम जारी केले. केंद्र सरकारने टीव्ही चॅनेल्सना संबंधित कायद्यांनी विहित केलेल्या प्रोग्राम कोडचे पालन करण्यास सांगितले असून सनसनाटी कव्हरेज आणि प्रक्षोभक दावे टाळण्याचा सल्ला दिला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सल्लागारात टेलिव्हिजन वाहिन्यांवर ज्या पद्धतीने मजकूर प्रसारित केला जातो त्याबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे. केबल टेलिव्हिजन नेटवर्क (नियमन) कायदा 1995 आणि त्याखालील नियमांचे उल्लंघन करणारी कोणतीही सामग्री प्रकाशित आणि प्रसारित करण्यापासून चॅनेल्सनी तात्काळ परावृत्त राहावे असे बजावले आहे.
केंद्र सरकारने युपेन-रशिया युद्धाचे वार्तांकन करताना वृत्त अँकरची सनसनाटी विधाने आणि निंदनीय मथळे आणि टॅगलाइनची विशिष्ट उदाहरणे देत काही महत्वपूर्ण सूचना केल्या आहेत. उत्तर-पश्चिम दिल्लीतील घटनांबाबत दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील काही वादविवादांमध्ये असंसदीय, चिथावणीखोर आणि अस्वीकार्य भाषा वापरली गेल्याचे सरकारचे म्हणणे आहे. गेल्या आठवडय़ात उत्तर पश्चिम दिल्लीतील हनुमान जयंती मिरवणुकीत दिल्लीच्या जहांगीरपुरी येथे दोन समुदायांमध्ये धुमश्चक्री झाल्यानंतरचे काही दाखलेही सरकारने दिले आहेत.
तसेच रशिया-युपेन युद्धाचा अहवाल देताना काही चॅनेल्स खोटे दावे करत आहेत आणि अनेकदा आंतरराष्ट्रीय एजन्सी किंवा कलाकारांची चुकीची माहिती देत आहेत. युद्धकाळात काही वाहिन्यांच्या पत्रकार आणि वृत्त अँकर्सनी प्रेक्षकांना भडकवण्याच्या उद्देशाने ‘कठोर आणि अतिशयोक्तीपूर्ण’ विधाने केल्याचेही दिसून आल्याचे केंद्र सरकारचे म्हणणे आहे.