पंतप्रधानांची ‘परीक्षा पे चर्चा’ ः क्रिकेटमधील उदाहरण देत विद्यार्थ्यांना दिला कानमंत्र
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांशी संवाद साधला. दोन तास चाललेल्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी मुलांच्या परीक्षा आणि आयुष्यातील ताणतणाव या प्रश्नांना उत्तरे दिली. कुटुंबीयांसह सहकाऱयांच्या तणावाचे जाळे दूर सारून बिनधास्तपणे परीक्षेला सामोरे जाण्याचा कानमंत्र पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना दिला.
‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमासाठी 20 लाखांहून अधिक प्रश्न प्राप्त झाले होते. या प्रश्नांना उत्तरे देताना पंतप्रधानांनी वेगवेगळी उदाहरणे देत मुलांना अनेक सल्ले दिले आहेत. घरातील आईचे व्यवस्थापन, क्रिकेटची गुगली, पतंगाचा मांजा, संसद भवनातील कामकाज अशी उदाहरणे देऊन पंतप्रधानांनी मुलांना अनेक गोष्टी समजावून सांगितल्या. एका विद्यार्थ्याने परीक्षेतील दबावाचा प्रश्न विचारला असता त्यालाही पंतप्रधानांनी अतिशय मार्मिकपणे उत्तर दिले. कौटुंबिक दबावाखाली येऊ नका. तुम्ही कधी क्रिकेट बघायला गेला आहात का? काही फलंदाज आले की, संपूर्ण स्टेडियम चौकार-चौकार, षटकार-षटकार अशा घोषणांचा आवाज बुलंद होतो. पण, कोणताही फलंदाज प्रेक्षकांच्या मागणीनुसार तो चौकार-षटकार मारतो का? फलंदाजाचे लक्ष फक्त चेंडूवर असते. गोलंदाजाने फेकलेल्या चेंडूकडे लक्ष देत फलंदाज खेळण्याचा प्रयत्न करतो. त्याचे लक्ष फक्त चेंडूवर केंद्रित झालेले असते. त्याप्रमाणेच परीक्षार्थींनीही केवळ आपली प्रश्नपत्रिका आणि ध्येय डोळय़ासमोर ठेवून परीक्षेचा सामना करायला हवा, असे पंतप्रधान म्हणाले. ताणतणाव टाळण्यासाठी स्वतःच्या सामर्थ्यावर लक्ष केंद्रित करा, असा सल्ला देतानाच जर आपण आपल्या ताकद किंवा सामर्थ्यावर लक्ष केंद्रित केले तर परीक्षाकाळात कोणताही तणाव येणार नसल्याचे स्पष्ट केले.
अधिकाधिक भाषा शिका!
संप्रेषण ही एक मोठी शक्ती आहे. ज्याप्रमाणे आपण पियानो किंवा तबला शिकण्याचा विचार करतो. त्याचप्रमाणे आपण आपल्या शेजारील कोणत्याही राज्याची किंवा देशाची भाषा शिकली पाहिजे. कोणतीही नवीन भाषा शिकल्यामुळे आपल्या ज्ञानात भरच पडत असते, असे पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना सांगितले.
गुलाम बनू नका!
सर्वप्रथम तुम्ही स्मार्ट आहात की गॅजेट्स स्मार्ट आहात हे ठरवा. कधी कधी असे दिसते की आपण गॅझेटला आपल्यापेक्षा अधिक हुशार समजतो. तथापि, गॅजेट्सचा वापर फक्त पुढे जाण्यासाठी केला पाहिजे. त्याच्यावरच पूर्णपणे विसंबून आपला विकास होणार नाही याची आठवणही पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना करून दिली.
ध्येयावर लक्ष केंद्रित करा
संसदेतील विरोधी पक्षातील लोकांना मानसशास्त्र माहीत असल्यामुळे वेगवेगळे मुद्दे उपस्थित करत ते मुद्दामहून सत्ताधाऱयांना अडकवण्याचा प्रयत्न करतात. अशा स्थितीत मूळ मुद्दय़ाला बगल न देता उत्तरे द्यावी लागतात. आपण फक्त आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. टीका करणे हे अवघड काम आहे. अशा परिस्थितीत लोक शॉर्टकट घेत आरोप करतात. दोघांमध्ये खूप फरक आहे. आपण आरोपांकडे लक्ष देऊ नये तर टीकेला आपल्यासाठी आवश्यक समजावे, असा मौलिक सल्लाही पंतप्रधानांनी दिला.
शिक्षकांनाही सल्ला
विद्यार्थ्यांना अनेक गोष्टी समजावून सांगतानाच पंतप्रधानांनी शिक्षकांचेही कान टोचण्याचा प्रयत्न केला. जेव्हा एखादा विद्यार्थी प्रश्न विचारतो तेव्हा त्याला तुमची परीक्षा घ्यायची नसते तर त्याला एखाद्या गोष्टीचे औत्सुक्य असते, हे आपण ध्यानात घेतले पाहिजे. कोणत्याही जिज्ञासू मुलाला रोखण्याचा प्रयत्न करू नका. उत्तर आले नाही तरी त्याला प्रोत्साहन द्या. तुझा प्रश्न खूप चांगला आहे असे सांगून त्याचे पूर्ण शंकानिरसन करण्याचा प्रयत्न शिक्षकांनी करायला हवा, असेही पंतप्रधानांनी सूचविले.