पालकमंत्री सतेज पाटील : 58 शिक्षकांचा करवीर भूषण पुरस्काराने गौरव
प्रतिनिधी/कोल्हापूर
नवीन शैक्षणिक धोरण अंमलात येत आहे. जिह्यातील शिक्षकांनी राजश्री छत्रपती शाहूंच्या भूमीत समर्थ पिढी घडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत असे प्रतिपादन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले. यावेळी 2019-20 सालातील 42 आणि व 20-21 मधील 16 अशा एकूण 58 शिक्षकांना पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते करवीर भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
करवीर पंचायत समिती शिक्षण विभागाच्यावतीने फुलेवाडी येथील वसंत हरी हॉल मध्ये आयोजित केलेल्या करवीर भूषण शिक्षक पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते.
पालकमंत्री पाटील पुढे म्हणाले, शैक्षणिक विकास निर्देशांकात कोल्हापूर जिल्हा प्रथम येण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत. जिल्हा परिषद प्रशासनाने प्रत्येक तालुक्याचा शैक्षणिक विकास निर्देशांक सूक्ष्मपणे काढावा. शैक्षणिक दृष्टय़ा जिल्हा प्रगतशील करणे आवश्यक आहे. आमदार पी.एन.पाटील म्हणाले, सध्याच्या परिस्थितीत शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. शिक्षकांनी यशस्वी पिढी तयार करण्यासाठी नियमित कार्यरत रहावे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते साठ शिक्षकांना करवीर भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.याप्रसंगी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील,शिक्षण सभापती रसिका पाटील, उपसभापती अविनाश पाटील, प्रदीप झांबरे, राजेंद्र सूर्यवंशी शिक्षणाधिकारी आशा उबाळे, गट विकास अधिकारी जयवंत उगळे, वसुंधरा कदम आदी उपस्थित होते. माजी सभापती मंगल पाटील यांनी स्वागत केले. गटशिक्षणाधिकारी एस.के.यादव यांनी प्रास्ताविक केले. संदीप मगदूम व सविता कुंभार यांनी सूत्रसंचालन केले. विश्वास सुतार यांनी आभार मानले.