पाच उपाध्यक्षांची निवड : समितीचा झेंडा फडकावण्याचा संकल्प
खानापूर : खानापूर तालुका म. ए. समितीची बैठक येथील शिवस्मारकात पार पडली. अध्यक्षस्थानी गोपाळराव देसाई होते. सचिव सीताराम बेडरे यांनी स्वागत केले. कार्याध्यक्ष यशवंत बिरजे यांनी बैठकीचा हेतू स्पष्ट करताना निवडणुकांबाबत उमेदवार निवड कशी करावी, तसेच तालुक्यात जागृती संदर्भात कोणते उपक्रम हाती घ्यावेत व उमेदवार ठरविताना नियमावली कोणती असावी, याबाबत मत मांडण्यात यावे, अशी सूचना यावेळी करण्यात आली. यानंतर कार्यकर्त्यांनी तालुक्यात समितीचा झेंडा कोणत्याही परिस्थितीत फडकाविण्यासाठी पुढील काळात अहोरात्र झटून समितीच्या ध्येयाबाबत जागृती करावी, तसेच समितीच्या त्यागाचा इतिहास नव तरुणासमोर मांडण्यासाठी जे काही करता येईल ते करावे, अशा सूचना कार्यकर्त्यांनी मांडल्या.
निवडणुका जवळ आल्याने आता जागृतीसाठी तातडीने दौरे हाती घ्यावे तसेच विस्तृत कार्यकारिणी व उपाध्यक्षांची निवड करावी, अशी मागणीही कार्यकर्त्यांनी करताच अध्यक्ष गोपाळराव देसाई यांनी सर्वांच्या संमतीने पाच उपाध्यक्षांच्या नावाची घोषणा केली. यामध्ये जांबोटी विभाग जयराम देसाई, गर्लगुंजी विभाग कृष्णा कुंभार, नंदगड विभाग अर्जुन देसाई, लोंढा कृष्णा मन्नोळकर, खानापूर शहर मारुती गुरव या उपाध्यक्षांची निवड करून त्यांचा सत्कार करण्यात आला. बुधवारी सकाळी 10 वाजता शिवस्मारक येथील शिवाजी पुतळ्याला अभिवादन करून कणकुंबी येथील माउली देवीला गाऱ्हाणे घालून जागृती दौऱ्याची सुरुवात करण्याचे बैठकीत ठरविले. यासाठी समिती कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी बुधवारी सकाळी 10 वा. शिवस्मारक येथे उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
बैठकीत माजी आमदार दिगंबर पाटील, अरुण सरदेसाई, विलास बेळगावकर, विठ्ठल गुरव, रमेश धबाले, अर्जुन देसाई, वसंत नावलकर, निरंजन सरदेसाई, शामराव पाटील, गोपाळ पाटील, पांडुरंग सावंत, नारायण लाड, आबासाहेब दळवी, रामा खांबले, मारुती परमेकर, रणजित पाटील, जयराम देसाई यांची भाषणे झाली. ज्येष्ठ सीमासत्याग्रही पुंडलिक चव्हाण, शटवाप्पा कदम, शंकर पाटील, समितीचे ज्येष्ठ नेते प्रकाश चव्हाण, मुरलीधर पाटील, मुकुंद पाटील, अजित पाटील, अविनाश पाटील, रुक्माण्णा झुंजवाडकर, प्रवीण पाटील, संतोष पाटील, दीपक देसाई, मऱ्याप्पा पाटील, पुंडलिक पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते.