हजारो वृक्षांची कत्तल : पर्यावरणप्रेमी नाराज : वृक्षतोडीवर आळा आवश्यक
बेळगाव : मागील काही वर्षात शहरात विकासकामांच्या नावाखाली हजारो झाडांची कत्तल झाली आहे. त्यामुळे साहजिकच शहरातील झाडांच्या संख्येत घट झाली आहे. रस्ते रुंदीकरण, गटारी, उ•ाणपूल, ड्रेनेज, जलवाहिन्या आणि इतर कामांसाठी अडथळा ठरणाऱ्या वृक्षांची तोडणी केली जाते. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास वाढला असून पर्यावरणप्रेमींतून नाराजीही व्यक्त होऊ लागली आहे. शहराच्या लोकसंख्येबरोबरच सीमा विस्तारू लागल्या आहेत. त्यामुळे शहरातील झाडांवर संकट ओढवले जात आहे. रस्ते रुंदीकरण, उ•ाणपूल आणि इतर सोयी-सुविधा निर्माण करण्यासाठी झाडांवर संकट येऊ लागले आहे. शहरातील विकासकामांना आड येणाऱ्या झाडांचा बळी घेतला जात आहे. त्यामुळे शहरातील झाडांच्या संवर्धनाबाबत आता प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
नैसर्गिकरित्या झाडे कोसळणे, धोकादायक झाडे हटविणे आणि विकासासाठी झाडे तोडणे आदी कारणांमुळे झाडांच्या सुरक्षिततेचा प्रश्नदेखील निर्माण झाला आहे. एकीकडे झाडे लावण्यासाठी प्रोत्साहन दिले जात असताना, दुसरीकडे मात्र मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होऊ लागली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस शहरातील झाडांचा प्रश्न गंभीर बनू लागला आहे. वनखात्याने झाडे तोडणाऱ्यांवर आळा घालावा, अशी मागणी होत आहे. विकासकामांच्या खोदाईमुळे झाडांची मुळे तोडली जात असल्याने अशा झाडांची पडझडही वाढू लागली आहे. शहरातील खुल्या जागा, रस्त्यांच्या दुतर्फा, सरकारी कार्यालये यासह इतर ठिकाणी दरवर्षी लाखो रोपांची लागवड केली जाते. यासाठी वनखाते लाखो रुपयांचा निधीदेखील खर्ची घालते. मात्र विकासाच्या कारणास्तव अशा झाडांवर कुऱ्हाड कोसळते. त्यामुळे वनखात्यालादेखील दरवर्षी लाखोंचा फटका बसतो. अलीकडे स्मार्ट सिटीच्या कामामुळे झाडांवर संकट कोसळले आहे. यात हजारो झाडांची कत्तल झाली आहे. त्यामुळे शहरात काँक्रिटीकरण वाढले असले तरी हिरवाई मात्र कमी झाल्याचे दिसत आहे.
रस्ते रुंदीकरणासाठी झाडे नष्ट
शहराबरोबरच शहराबाहेरील रस्ते रुंदीकरणासाठी अनेक झाडांची कत्तल वाढली आहे. बेळगाव-सांबरा मार्गावर चौपदरीकरणासाठी झाडांची तोडणी सुरू आहे. त्याचबरोबर इतर ठिकाणीदेखील रस्त्यात अडथळा ठरणाऱ्या झाडांना मोकळे केले जात आहे. त्यामुळे रस्ते रुंदीकरणातदेखील झाडे अधिक प्रमाणात नष्ट होत असल्याचे दिसून येत आहे.
पुनर्रोपणाचे काय?
झाडांची कत्तल कमी करण्यासाठी विकासकांना पुनर्रोपणाची अट घालण्यात आली होती. दरम्यान झाडांची कत्तल होणार नाही, असा दावा वनखाते आणि मनपाने केला होता. मात्र याकडे दुर्लक्ष करून झाडांची कत्तल सुरूच आहे. त्यामुळे शहरात वृक्ष संवर्धनाऐवजी वृक्षतोड अधिक प्रमाणात दिसून येत आहे.
पुन्हा रोपे लावून वृक्षसंवर्धनासाठी प्रयत्न
शहरात विकासकामांसाठी झाडांची तोड केली जाते. दरवर्षी साधारण 500 हून अधिक झाडे तोडली जातात. मात्र झाडे तोडताना वनखात्याची परवानगी आवश्यक आहे. रस्ते आणि इतर विकासकामांवेळी झाडे तोडताना परवानगी घेणे गरजेचे आहे. दरवर्षी पुन्हा रोपे लावून वृक्षसंवर्धनासाठी प्रयत्न होत आहेत.
– पुरुषोत्तम रावजी (आरएफओ, वनखाते)