ऑनलाईन टीम / मुंबई :
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी रविवारी पुण्यात अयोध्या (Ayodhya) दौऱ्याची घोषणा केली. 5 जूनला राज ठाकरे अयोध्येला जाणार असून, त्यापूर्वी केंद्र सरकार त्यांना विशेष सुरक्षा (special security) पुरवणार आहे. सूत्रांच्या हवाल्याने एका संकेतस्थळाने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
मशिदींवरील भोंग्याबाबत राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे राज्यासह देशभरातील राजकीय वातावरण तापले आहे. या मुद्यावरून समाजात धार्मिक तेढ किंवा इतर अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे राज ठाकरे यांना अयोध्या दौऱ्यापूर्वी विशेष सुरक्षा दिली जाणार आहे. राज ठाकरे यांना सध्या राज्य सरकारची वाय प्लस सुरक्षा असून, आता केंद्र सरकार अयोध्या दौऱ्यापूर्वी राज ठाकरेंना विशेष सुरक्षा पुरवण्याच्या विचार करत आहे. तर उत्तरप्रदेशमध्ये योगी सरकारही राज ठाकरे यांना अधिकची सुरक्षा पुरवणार असल्याची माहिती आहे.