जम्मू-काश्मीर प्रचार समिती अध्यक्षपदाचा दोन तासात राजीनामा ः काँग्रेसला मोठा झटका
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. काँग्रेसने मंगळवारी वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांना प्रदेश प्रचार समिती अध्यक्षपदी नियुक्त केले होते. परंतु आझाद यांनी केवळ 2 तासांमध्येच या पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनाम्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. स्वतःच्या शिफारसींकडे दुर्लक्ष केले जात असल्याने नवी जबाबदारी स्वीकारण्यास आझाद यांनी नकार दिल्याचे सूत्रांकडून समजते. तर आझाद यांनी प्रकृती अस्वास्थामुळे प्रचार समिती अध्यक्षपद स्वीकारण्यास नकार दिल्याचा दावा काँग्रेस पक्षाने केला आहे. तर आझाद हे नवा पक्ष स्थापन करणार असल्याच्या चर्चेनेही जोर पकडला आहे.
नवी जबाबदारी देण्याप्रकरणी आझाद यांकी पक्षनेतृत्वाचे आभार मानले आहेत. गुलाम नबी आझाद हे पक्षाच्या जी-23 गटात सामील आहेत. या गट पक्षात अनेक मोठे बदल घडवून आणण्याची मागणी करत आहे. अशा पार्श्वभूमीवर या राजीनाम्याने आझाद आणि काँग्रेस नेतृत्वासोबतच्या त्यांच्या संबंधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारकडून आझाद यांना चालू वर्षातच पद्मभूषणने गौरविण्यात आले आहे.
विकार रसूल प्रदेशाध्यक्षपदी
दुसरीकडे विकार रसूल वानी यांना जम्मू-काश्मीर काँग्रेस अध्यक्ष करण्यात आले ओ. यापूर्वी अहमद मीर हे प्रदेशाध्यक्ष होते. वानी यांना गुलाम नबी आझाद यांचे निकटवर्तीय मानले जाते. वानी हे बनिहालचे आमदार राहिले आहेत. काँग्रेस नेतृत्व आझाद समर्थकांना त्यांच्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करत असल्याचे मानले जात आहे. गुलाम नबी आझाद आणि काँग्रेस नेतृत्व यांच्यातील हा सुप्त संघर्ष मागील दीड वर्षापासून सुरू आहे. हा संघर्ष संपण्याऐवजी तो अधिकच तीव्र होत आहे. काँग्रेस नेतृत्व जम्मू-काशमीरमधील आझाद यांचा प्रभाव कमी करू पाहत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तर आझादही वेळोवेळी पक्षनेतृत्वाला आव्हान देत आहेत.
आझाद यांचा जी-23 गट
5 महिन्यांपूर्वी 5 राज्यांमधील नामुष्कीजनक पराभवानंतर गुलाम नबी आझाद यांच्या निवासस्थानी काँग्रेसच्या असंतुष्ट जी-23 गटाची बैठक झाली होती. यानंतर पक्षात नेतृत्वावरून बंड होण्याची शक्यता व्यक्त होत होती. काँग्रेस कार्यकारिणी बैठकीत सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका वड्रा यांनी राजीनाम्याची तयारी दर्शविली होती. परंतु बैठकीतील अन्य नेत्यांनी राजीनामा देण्यापासून त्यांना रोखले होते. त्यानंतर सोनिया गांधी आणि आझाद यांच्यात चर्चाही झाली होती.
जम्मू क्षेत्रात प्रभाव
आझाद यांचे समर्थक मानल्या जाणाऱया 20 नेत्यांनी काही काळापूर्वी काँग्रेसच्या पदांचा राजीनामा दिला होता. याच्या माध्यमातून आझाद हे जम्मू-काश्मीर काँग्रेस समितीत स्वतःचे वर्चस्व निर्माण करू पाहत होते, परंतु पक्षनेतृत्वाने झुकण्याऐवजी या नेत्यांचे राजीनामे मंजूर केले होते. जम्मूक्षेत्रात आझाद यांचे समर्थक मोठय़ा संख्येत आहेत. रामबन, डोडा, किश्तवाड, रियासी आणि उधमपूर या जिल्हय़ांमध्ये 12 विधानसभा मतदारसंघ आहेत. या जिल्हय़ांवर लक्ष केंद्रीत करून आझाद हे किंगमेकर ठरण्याचा प्रयत्न करत होते.