वृत्तसंस्था/ लखनौ
उत्तरप्रदेशात योगी आदित्यनाथ सरकार पुन्हा सत्तेवर आल्यानंतर 23 मेपासून पहिले विधिमंडळ अधिवेशन सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाने रविवारी विधिमंडळ गटाची बैठक घेतली. या बैठकीत आझम खान आणि त्यांचे पुत्र अब्दुल्लाह आझम सामील न झाल्याने राजकीय वर्तुळात अनेक प्रकारच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. आझम खान हे समाजवादी पक्षाच्या नेतृत्वावर नाराज असल्याचे मानले जात आहे.
सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मिळाल्याने आझम यांनी अलिकडेच तुरुंगातून सुटका झाली आहे. तुरुंगातून बाहेर पडल्यावर पत्रकारांशी बोलताना आझम यांनी सर्वात अधिक अत्याचार माझ्या स्वकीयांनीच केला असल्याचे विधान केले होते. आझम यांच्या या टिप्पणीकडे पक्षाध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावरील नाराजीच्या स्वरुपात पाहिले जात आहे. आझम यांच्यासह शिवपाल यादवही या बैठकीला अनुपस्थित राहिले आहेत. शिवपाल आणि आझम हे राजकीयदृष्टय़ा एकत्र येणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.