लालकृष्ण अडवाणी आणि इतर नेत्यांना मोठा दिलासा
अलाहाबाद / वृत्तसंस्था
अयोध्येतील बाबरी विध्वंस प्रकरणातील अपील याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने फेटाळली आहे. त्यामुळे या प्रकरणात आरोपी असणारे भाजपचे वयोव़द्ध नेते लालकृष्ण अडवाणी आणि इतर मान्यवरांना मोठाच दिलासा मिळाला आहे. बुधवारी उच्च न्यायालयाने आपला निर्णय दिला.
काही महिन्यांपूर्वी फैझाबाद सत्र न्यायालयाने बाबरी विध्वंस प्रकरणी सर्व 32 आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती. या निर्णयाविरोधात अयोध्येचे निवासी असणारे हाजी मोहम्मद अहमद आणि सय्यद अखलाख अहमद यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाकडे अपील याचिका सादर केली होता. या याचिकेची सुनावणी न्या. रमेश सिन्हा आणि न्या. सरोज यादव यांच्या खंडपीठासमोर झाली. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून खंडपीठाने निर्णय दिला.
अपील याचिका सादर करणाऱया व्यक्तींचा या प्रकरणाशी कोणताही संबंध नाही. ते या प्रकरणातील पिडीत नाहीत. त्यामुळे कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर आक्षेप घेण्याचा या याचिकाकर्त्यांना कोणताही अधिकार नाही. त्यामुळे त्यांनी सादर केलेली याचिका न्यायालयात टिकाव धरु शकत नाही, असा युक्तिवाद उत्तर प्रदेश राज्य सरकारच्या वतीने खंडपीठासमोर करण्यात आला होता.
प्राथमिक मुद्दय़ावरच याचिका रद्द
या याचिकेला कोणतीही वैधता नसल्याने ती तत्काळ फेटाळण्यात यावी, अशी विनंती सरकारच्या वतीने न्यायालयाला करण्यात आली होती. या प्राथमिक मुद्दय़ावर न्यायालयाने आपला निर्णय सुरक्षित ठेवला होता. तो बुधवारी घोषित करण्यात आला. सरकारचा युक्तिवाद न्यायालयाने प्रमाण मानला आहे.