अपघाताच्या अनुषंगाने बोलावलेली बैठक निष्फळ, अधिकारी हजर राहिल्यास निर्णय घेता आले असते : मंत्री फळदेसाई
सांगे : रविवारच्या भीषण अपघाताच्या घटनेनंतर उद्भवलेल्या परिस्थितीवर पेप्सी कंपनीच्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून तोडगा काढण्यासाठी मंगळवारी सकाळी कोठार्ली येथे आयोजित केलेल्या बैठकीला पेप्सी कंपनीचा अधिकारी वर्ग उपस्थित न राहिल्याने बैठकीत कोणताही ठोस निर्णय होऊ शकला नाही. रविवारी अपघात होऊन मंज्योत च्यारी याचा घटनास्थळी मृत्यू झाला होता. त्यानंतर ग्रामस्थ घटनास्थळी जमा होऊन त्यांनी जोपर्यंत कंपनीचे अधिकारी येत नाहीत आणि ठोस आश्वासन देत नाहीत तोपर्यंत मृतदेह हलविण्यास पोलिसांना मज्जाव केला होता. मग घटनास्थळी समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी येऊन ग्रामस्थांशी आणि तेथे पोहोचलेल्या कंपनी अधिकाऱ्यांकडे बोलणी करून मंगळवारी ग्रामस्थ, कंपनी अधिकारी, प्रशासन यांची संयुक्त बैठक ठरविली होती. त्यानुसार मंत्री फळदेसाई, ग्रामस्थ आणि प्रशासनातील अधिकारी बैठकीला उपस्थित राहिले. मात्र पेप्सी कंपनीचे अधिकारी बैठकीला आलेच नाहीत. वास्तविक रविवारी कंपनीच्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांकडून धक्काबुकी झाली होती. त्यानंतर त्यांनी पोलीस तक्रारही केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी अधिकाऱ्यांना गावात बैठक आयोजित केलेली नको असून जिल्हाधिकारी कार्यालय किंवा अन्य सरकारी ठिकाणी बैठक हवी आहे.
कंपनीविषयी बऱ्याच तक्रारी
यावेळी बोलताना सांगेचे आमदार आणि मंत्री फळदेसाई म्हणाले की, पेप्सी कंपनी व्यवस्थापन आणि कामगारांतही संबंध बरोबर नाहीत. कामगारांची सतावणूक चालू आहे. कंपनीत गैरव्यवहार आहेत. कामगारांना सात वर्षे काम करूनही आवश्यक सुविधा मिळत नाहीत. कामगारांना सेवेत कायम केले जात नाही, अशा बऱ्याच तक्रारी आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. पाच महिन्यांपूर्वी अपघात घडला असता बैठक घेऊन रस्ता अऊंद असल्यामुळे अवजड वाहनांची वाहतूक सुरळीतपणे होण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याचे ठरले होते. अवजड वाहनांपूर्वी ‘एस्कॉर्ट वाहन’ सोडायचे जेणेकरून दुचाक्या व अन्य लहान वाहनांना त्याच्यामागून अवजड, अर्थात दहा, बारा वा सोळा चाकी वाहन किंवा डम्पर येत असल्याचे कळेल, असे ठरले होते. काही दिवस याची अंमलबजावणी झाली. नंतर ते बंद झाले, याकडे फळदेसाई यांनी लक्ष वेधले.
कंपनीचा पवित्रा संतापजनक
कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या बैठकीला पाचारण करण्यात आले होते. ते हजर राहिल्यास मयत व्यक्तीच्या कुटुंबाचा प्रश्न, स्थानिक कामगारांचा प्रश्न आणि ग्रामस्थांच्या समस्यावर चर्चा करून निर्णय घेता आला असता. दोन तास हॉलमध्ये मंत्री, प्रशासनातील अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित राहिले, पण कंपनी अधिकारी आलेच नाहीत. एवढा मोठा अपघात होऊन दोघांचा त्यात मृत्यू झाला. पण एक तासभरही कंपनीने उत्पादन बंद ठेवले नाही. हा संतापजनक प्रकार आहे, असे फळदेसाई म्हणाले. दरम्यान, या प्रकरणी विधानसभा अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाममंत्री यांच्याबरोबर संबंधितांची बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. मंगळवारच्या बैठकीला उपजिल्हाधिकारी मिलिंद्र वेळीप, मामलेदार गौरव गावकर, पोलीस उपअधीक्षक नीलेश राणे, पोलीस निरीक्षक प्रवीण गावस इत्यादी हजर होते.