बेळगाव : बेळगाव शहराचा स्मार्ट सिटी योजनेमध्ये समावेश करण्यात आला असला तरी शहरातील रस्त्यांची अवस्था पाहिल्यास हीच का स्मार्ट सिटी, असा प्रश्न वाहनधारकांतून उपस्थित केला जात आहे. अनेक महत्त्वाच्या रस्त्यांवर निर्माण झालेले खड्डे वाहनधारकांसाठी धोकादायक ठरत आहेत. याकडे मनपा लक्ष देणार का? असा प्रश्न वाहनधारकांतून उपस्थित केला जात आहे. दक्षिण विभाग रहदारी पोलिसांच्या पोलीस स्थानकासमोरच असणाऱ्या उभा मारुती जवळून कॅम्पमध्ये जाणाऱ्या रस्त्यावर पावसाचे पाणी साचून खड्डा निर्माण झाला आहे. यामधून वाहनधारकांना वाट काढताना चांगलीच कसरत करावी लागत आहे.
खड्ड्याचा अंदाज लागत नसल्यामुळे अपघाताला सामोरे जावे लागत आहे. रस्त्यावरील पाण्याच्या निचऱ्यासाठी कोणतीच सोय करण्यात आली नसल्यामुळे पावसाचे पाणी साचून रस्त्याला डबक्याचे स्वरुप आले आहे. कॅम्पमधून शहरामध्ये येणाऱ्या वाहनधारकांसाठी सदर खड्डा धोकादायक ठरत आहे. तर दुचाकीस्वारांना अपघाताला सामोरे जावे लात आहे. रहदारी पोलिसांकडून वाहनधारकांना नियमांचे पालन करण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. रस्त्यांसाठी कोट्यावधी रुपये खर्च करण्यात येत असले तरी दर्जेदार रस्ते निर्माण करून देण्याकडे लक्ष दिले जात नाही. वाहनधारकांना अपघात झाल्यानंतरच अधिकारी लक्ष देणार का? असा सवाल वाहनधारकांतून उपस्थित केला जात आहे.