वार्ताहर /खानापूर
खानापूर मलप्रभा नदीघाटाजवळ असलेल्या पाणी अडविण्याच्या नवीन बंधाऱयाच्या बाजूला असलेल्या रुमेवाडी नाका ते मारुतीनगर या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने डबक्यांचे स्वरुप निर्माण झाले आहे. पाणी अडविण्याचा बंधारा भक्कम झाला असला तरी रस्त्यावर खड्डे पडल्याने येथून वाहतूक करणे कठीण झाले आहे.
जुना पूल काढून या ठिकाणी ब्रिजकम बंधाऱयाची उभारणी दोन वर्षांपूर्वी करण्यात आली. मात्र, दोन्ही बाजूंच्या रस्त्याची अवस्था मात्र दयनीय झाली आहे. रुमेवाडी क्रॉसच्या बाजूने येणाऱया रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने याच्यातून मार्ग काढणे कठीण झाले आहे.
या ठिकाणी छोटे-मोठे अपघात होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे खानापूर शहराच्या बाजूने मलप्रभा नदीला आलेल्या महापुरामुळे खचलेला रस्ता दुरुस्त करण्यासाठी कोणतेच पाऊल उचलण्यात आले नाही.
या ठिकाणी अंत्यसंस्कारासाठी किंवा रक्षाविसर्जनसाठी बेळगावसह अनेक भागातील लोक येत असतात. या बंधाऱयाच्या दुतर्फा झालेली दुरवस्था पाहून या रस्त्याला कोणी वाली आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.