अध्याय एकविसावा
भगवंत म्हणाले, विषयात बुडणाऱया लोकांचा उद्धार करण्याकरिताच माझी वेदवाणी आहे. तिच्यात सकामपणा नाही परंतु मंदबुद्धीचे लोक वेदातील विधी सकामच आहेत अशी बडबड करतात. काही अज्ञानी लोक वरवर गोड वाटणाऱया फलश्रुतीला भुलतात, परंतु वेदांचे रहस्य जाणणारे मात्र असे सांगत नाहीत. मीठ समुद्राला भेटावयास गेले असता त्याचा खारटपणाच नाहीसा होतो, त्याप्रमाणे माणसाची स्वधर्माकडे प्रवृत्ती झाली की, त्याची सकाम कर्म करण्याची प्रवृत्तीच राहात नाही. स्वधर्मकर्माने वागले असता आपोआपच निष्कर्मता प्रकट होते.
कर्माकर्म हे एक कळकाचे बेट आहे, त्याला स्वधर्माचे घर्षण झाले म्हणजे त्यात चित्तशुद्धीची ठिणगी पडते आणि ती त्या कर्माकर्माचे जाळून भस्म करते. कामना धरून कर्म केले तरी, स्वधर्म हा फलेच्छेचा नाश करतो त्यावेळी सकाम आणि निष्काम या दोहोचेही स्वधर्म भस्म करून टाकतो. दोन लाकडे एकावर एक घासली असता त्यात अग्नि उत्पन्न होतो, आणि तो त्या दोन्ही लाकडांना जाळून आपल्याच दीप्तीने प्रगट होतो. त्याप्रमाणे माझी वेदवाणी आहे ती स्वकर्मानेच कर्मबंध छेदून टाकते. हे वर्म न कळल्यामुळे विषयांध असतो तो फलाच्या आशेला जखडला जातो.
वेदाने स्वकर्मप्रवृत्तीमध्ये रुची उत्पन्न व्हावी म्हणून स्वर्गादिक अनेक फळे सांगितली आहेत पण त्यांच्याच जो नादी लागतो, तो आपल्या लाभाला मुकतो. पुष्कळ मेहनत घेऊन शेतामध्ये हरभरा पेरला आणि तो उपटून त्याची भाजी केली, तर तो लाभ समजावा की हानी समजावी? त्याचप्रमाणे सकामाने फळ भोगणे आहे.
जोंधळय़ाची ओली ताटे खाऊ लागलो असता मोठी गोड लागतात म्हणून त्याच्यासाठी जर सारे शेतच उपटले, तर लाभ की आपली नागवण झाली म्हणावी? त्याप्रमाणे जे लोक सकाम बुद्धीने उन्मत्त होतात, जे फलाच्या आशेला लुब्ध होतात, ते स्वधर्माच्या लाभाला कसे अंतरतात, तेही तुला सांगतो ऐक. शेतात पेरावयासाठी हरभरे आणले, त्यांचे जो आवडीने भाजून फुटाणे करील, त्याला शहाणा म्हणावा की मूर्ख म्हणावा? त्याप्रमाणेच सकामांचे फल भोगणे आहे! घोडा विकून खोगीर घ्यावे. किंवा लोणी देऊन टाकून ताक मागावे, भात टाकून पेज प्यावी, त्याप्रमाणेच सकामाचे फल भोगणे आहे. असे जे सकाम आणि अत्यंत दुर्बुद्ध असतात ते स्वधर्माच्या सिद्धीला मुकतात. म्हणून देव त्यांना ‘कुबुद्धी’ म्हणतात. त्या कुबुद्धीची लक्षणेही श्रीकृष्ण सांगत आहेत. विषयांची इच्छा करणारे दीनहीन, लोभी पुरूष, स्वर्ग इत्यादी फुलांनाच फळे समजतात. अग्नीच्याद्वारा सिद्ध होणाऱया यज्ञ इत्यादी कर्मांना भुलतात त्यामुळे त्यांना शेवटी देवलोक, पितृलोक इत्यादींचीच प्राप्ती होते त्यांना आत्मस्वरूपाची कधीच ओळख होत नाही. सकामांची तृष्णा कधीच पुरी होत नसते. कामाच्या इच्छेने तो सर्वकाळ दीन असतो, त्यामुळे त्याला ‘कृपण’ असे म्हणतात. बगळा पाण्यामध्ये माशासाठी जसा ध्यान धरून टपून बसतो, त्याप्रमाणे सकाम मनुष्य फलेच्छेलाच लुब्ध होऊन अनु÷ान करीत असतो.
परपुरुषापाशी जाणे सुलभ व्हावे म्हणून जारिणी स्त्री ज्याप्रमाणे आपल्या पतीच्या पुढे पुढे नाचत असते, त्याप्रमाणे तोही मनामध्ये फलेच्छा धरून स्वधर्मकर्म आचरीत असतो. अज्ञान मूल ज्याप्रमाणे फुलालाच फळ समजते, त्याप्रमाणे तोही मूर्खपणाने स्वर्गातील सुखे कायम टिकणारी आहेत असे समजतो. त्या स्वर्गसुखाप्रीत्यर्थ कर्म यथासांग होईल की नाही हाही संशय त्याला वाटत असतो, त्यामुळे तो अत्यंत दीन होतो. सकाम नेहमी दीन झालेला असतो, त्या दीनत्वामुळे अति कृपण कृपणत्वामुळे लोभी होतो आणि लोभामुळे त्याचे ज्ञान महामोह ग्रासून टाकतो. मोह खवळला म्हणजे तो विवेकासहवर्तमान ज्ञानालाच गिळून टाकतो. त्यावेळी बुद्धीमध्ये अंतर्बाह्य तमोगुणच भरून उचंबळू लागतो. तमोगुणाने वृत्ती भरली म्हणजे धुके कोंदाटल्याप्रमाणे स्थिती होऊन जाते. आंधळय़ाच्या संगतीने ज्याप्रमाणे अंधेऱया रात्री आडरानात चुकावे त्याप्रमाणे गत होते.
क्रमशः