शहरातील 300 किलोमिटरसाठी दोनशे कोटींची गरज
कोल्हापूर नव्हे खड्डेपूर नव्या ओळखीला प्रशासनासह लोकप्रतिनिधी जबादार
कोल्हापूर : संतोष पाटील
बारा वर्षानंतर कसबसा पूर्णत्वास आलेली 108 कोटी रुपयांची कावसछाप नगरोत्थान योजना, वादग्रस्त एकात्मिक रस्ते विकास प्रकल्प, शासन व महापालिकेच्या निधीतून शहरातील प्रमुख 150 रस्त्यांची निकृष्ट झालेली बांधणीमुळे शहरांतर्गत वाहतूक पाठीचा मणका ढिला करणारी ठरत आहे. शहरातील अंतर्गत रस्ते काही अंशी ठिक असले तरी प्रमुख वाहतूक मार्गावरील सुमारे अडीचशे किलोमिटरचे रस्ते खड्डय़ात असल्याचे आकडेवारी सांगते. मागील तीन वर्षापासून तुफान पावसाचे कारण पुढे करुन यंत्रणा हात वर करीत असली तरी लोकप्रतिनिधी, भ्रष्ट यंत्रणा आणि प्रशासनाच्या मिलीभगतमुळेच कोल्हापूरची वाटचाल खड्डेपूरकडे होत असल्याचे वास्तव आहे. कोल्हापूररकरांचे सामाजिक स्वास्थ बिघडवणारे खड्डेयुक्त रस्त्यांची दुरुस्तीसाठी राजकारणापलिकडे जाऊन सर्वपक्षीय राजकारण्यांनी लक्ष दिले तर आणि तरच या समस्येतून सुटका शक्य आहे.
विषारी घटक वाढले
गेल्या शंभर वर्षात शहरातील रस्त्यावर दहा पटीने ताण वाढला. मात्र रस्त्यांची क्षमता जैसे थे आहे. शहरातील वाहने वाढली तशी वाहनांची गती वाढण्यापेक्षा ती रेंगाळणारीच ठरली. निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांमुळे वाहतूक रेंगाळत आहे. परिणामी गेल्या दहा वर्षात शहरातील हवेत सल्फर डायऑक्साईड (एसओ-टू) ऑक्साईड नायट्रोजन (एनओएक्स) सारख्या विषारी घटकांची सहापटीने वाढ झाल्याचे आकडेवारी दर्शविते. नॅशनल कॉम्बिएन्ट एअर क्वालिटी मॉनिटीरिंग (एनएएक्यूएम)च्या अहवालानुसार शहरातील हवा अधिक घातक झाल्याचे निदर्शनास येत आहे.
रेंगाळणाऱया वाहतुकीने घातक धुलीकणांची वाढ
महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड (एमपीसीबी) व शिवाजी विद्यापीठाचा पर्यावरण विभाग शहरातील महाव्दार रोड, दाभोळकर कॉर्नर, विद्यापीठ परिसरापासून इतर गजबजलेल्या व गर्दी नसलेल्या ठिकाणी आठवडय़ातील 48 तास हवेतील सुक्ष्म कणांचे मायक्रोग्रॅम प्रती एमक्युबिक प्रमाणात निरीक्षण करुन नोंदी ठेवीतात. 2004 साली शहरातील हवेतील एसओ-टूचे 4.98 प्रमाण 2015 मध्ये 22.81 झाले आहे. तर एनओएक्सचे प्रमाण 11.52 वरुन 36.05 झाले आहे. श्वसनास घातक ठरणारे कणांचे (आरएमपीएम) प्रमाण 70.56 वरुन 343.75 वर गेले आहे. हवेतील धुलीकण (एसपीएम) 158.58 वरुन 284.14 वर पोहचल्याचे आकडेवारी सांगते. दहा वर्षापूर्वी कोल्हापुरातील हवेतील गोंगाट सरासरी 65 ते 70 डेसीबल होता. यामध्ये सरासरी 20 डेसीबलची वाढ झाली आहे. हे सर्व रेंगाळणाऱया वाहतुकीचे परिणाम आहेत.
हवेतील धुळीकणाचे दुष्परिणाम
श्वसनाचे आजार , डोकेदुखी, अस्वस्थता, दम लागणे, डोळे चुरचुरणे, त्वचेचे विकार, डोळ्यांना इजा.
शहरात 100 किलोमिटरची मृत्यूरेषा
शहर एकात्मिक विकास प्रकल्पातील त्रृटींनी आता डोकेवर काढण्यास सुरुवात केली आहे. प्रकल्पांर्गत शहरात 50 किलोमिटरचे कॉक्रिट व डांबरी असे दुहेरी रस्ते करण्यात आले आहे. डांबरी व कॉक्रिटच्या 100 किलोमिटर रस्त्यांच्या मध्यभागी तीन ते सहा सेंमींइतक्या जाडीच्या भेगा पडल्या आहेत. वाहनधारकांसाठी खासकरुन दुचाकीस्वारांसाठी या भेगा साक्षात मृत्यूरेषा ठरत आहेत.
वाहनांचे मोठे नुकसान
रस्त्यांमध्ये पडलेले खड्डे केवळ आरोग्याचेच नाही, तर वाहनांचेही नुकसान मोठय़ा प्रमाणावर करतात. प्रमुख जिल्हा व राज्यमार्गांवर पडलेल्या खड्डय़ांमुळे अनेक वाहने निकामी होत आहेत. खड्डय़ांमुळे वाहने नादुरूस्त होतात. आणि हिच नादुरूस्त वाहने नंतर अपघातास कारणीभूत ठरतात. वाहनांच्या दुरूस्तीसाठी मोठा खर्च करावा लागतो. खराब रस्त्यामुळे नागरिकांची कोणतीही चूक नसताना त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
मतांवर डोळा : मुख्य रस्त्यांची चाळण
महापालिकेच्या नोंदीनुसार शहरातील सर्व लहान मोठय़ा गल्लीबोळांसह एकूण 1031 किलोमिटरचे रस्ते आहेत. यातील एकात्मिक रस्ते प्रकल्पातील 49 किमी., लिंक रोड 19 किमी आणि नगरोत्थान योजनेतील 39 किमी, राष्ट्रीय महामार्ग सहा किमी असे 114 किलोमिटरच्या रस्त्यांवर वाहतुकीचा सर्वाधिक भार आहे. हेच रस्ते प्रामुख्याने वाहतुकीसाठी वापरले जातात. यासह 80 प्रभागांना जोडणारे हद्दीवरचे तसेच मुख्य चौक आणि बाजारपेठेतील रस्ते ज्या ठिकाणी नागरी वस्ती कमी आहे किंवा नाहीच, अशा रस्त्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. मतांवर डोळा ठेवून दर दोन तीन वर्षानंतर गल्लीबोळ चकचकीत करण्याकडे कल असतो. एकात्मिक रस्ते प्रकल्प, लिंकरोड, दोन प्रभागातील हद्दीतील रस्ते, राष्ट्रीय महामार्ग, आदी सुमारे दीडशे किलोमिटरच्या रस्त्यांची मजबूत बांधणी आणि पुर्नपृष्ठीकरणासह दुरुस्तीसाठी एकाच वेळी तीनशे कोटी रुपयांची गरज आहे. त्यानंतर या रस्त्यांसाठी दर वर्षी सरासरी 25 कोटी रुपये खर्च करावे लागतील. तरच शहरातील रस्त्यांची दुरवस्था ही समस्या कायमची निकाली लागू शकते.