ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
सहा महिन्यांपासून बंद असलेल्या बद्रीनाथ धामचे दरवाजे आज सकाळी उघडण्यात आले. दरवाजे उघडण्यापूर्वी बद्रीनाथ मंदिर फुलांनी आणि दिव्यांनी सजवण्यात आलं होतं. धार्मिक विधी, मंत्रोच्चार आणि लष्करी बँडच्या सुरांनी ब्रह्म मुहूर्तावर सकाळी 6.15 वाजता हे मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. या पवित्र सोहळय़ाचे साक्षीदार होण्याकरिता मोठ्या संख्येने भाविक बद्रीनाथला पोहोचले आहेत.
बद्रीनाथ धामाबरोबरच आज सकाळी 6.15 वाजता सुभाई गावात असलेल्या भविष्य बद्री धामचेही दरवाजे उघडण्यात आले. पुढील 6 महिने भाविकांना दोन्ही मंदिरात भगवान बद्रीनाथाचे दर्शन घेता येणार आहे. दरवाजे उघडण्याच्या प्रसंगी, भगवान बद्री विशाल यांना नैवेद्य दाखवण्यात आला आहे. सध्या बद्रिनाथ परिसरामध्ये कडाक्याची थंडी आहे. तब्बल दोन वर्षानंतर यंदा बद्रिनाथाच्या मंदिरामध्ये जाऊन भाविकांना दर्शन घेता येणार आहे. त्यामुळे भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. कोरोना निर्बंधांमध्ये सूट देण्यात आल्यानं यंदा बद्रीनाथ यात्रेत विक्रमी गर्दी होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, यंदा चार धाम यात्रेला गर्दी होण्याची शक्यता असल्याने उत्तराखंड सरकारने यात्रेकरूंच्या संख्येची दैनंदिन मर्यादा निश्चित केली आहे. बद्रीनाथ मंदिरासाठी दैनंदिन मर्यादा 15,000, केदारनाथसाठी 12,000, गंगोत्री धामसाठी 47000 तर यमुनोत्री धामसाठी दैनंदिन मर्यादा 4,000 ठेवण्यात आली आहे. त्यामुळे बद्रीनाथ मंदिरात दिवसांत केवळ 15 हजार भाविकांनाच दर्शन घेता येणार आहे. दर्शनासाठी पर्यटन विभागाच्या वेबसाइटवर नोंदणी करणं बंधनकारक करण्यात आलं आहे.