ऑनलाईन टीम / तरुण भारत :
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर शाईफेक करणाऱ्या मनोज गरबडेसह तिघांना पुण्याच्या सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. महापुरुषांविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी पाटील यांना शनिवारी चिंचवडगावात शाईफेकीच्या घटनेला सामोरे जावे लागले होते.
महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भीक मागून शाळा चालवल्या असे वादग्रस्त विधान पाटील यांनी केलं होतं. त्यामुळे त्यांच्याविरोधात विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली होती. दरम्यान, शनिवारी पाटील चिंचवडगावात एका कार्यक्रमासाठी आले असता यांच्या तोंडावर शाई फेकण्यात आली होती.
अधिक वाचा : राष्ट्रवादीच्या नेत्या डॉ. प्राची पवार यांच्यावर टोळक्याकडून जीवघेणा हल्ला
शाईफेकप्रकरणी समता सैनिक दलाचे संघटक मनोज भास्कर गरबडे, समता सैनिक दल सदस्य धनंजय भाऊसाहेब ईचगज आणि वंचित बहुजन आघाडीचे सचिव विजय धर्मा ओवाळ यांना चिंचवड पोलिसांनी अटक केली होती. या तिघांवरही भादवि कलम 307, 353, 294, 500, 501, 120 (ब) 34 क्रिमिनल अमेंन्डमेंन्ट ऍक्ट कलम 7 महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1) 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामधील कलम 307 लावण्यावरुन बराच गदारोळ झाल्याने काल पोलिसांनी हे कलम मागे घेतलं होतं. पुणे सत्र न्यायालयाने या तिन्ही आरोपींना आज जामीन मंजूर केला.