ऑनलाईन टीम / लखनऊ :
राज ठाकरे 5 जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यासाठी मनसेकडून जोरदार तयारी सुरू आहे. पण उत्तर प्रदेशातील भाजपा खासदार बृजभूषण सिंह (brijbhushan singh) यांनी राज ठाकरेंना अयोध्या दौऱ्यावर येण्यापूर्वी उत्तर भारतीयांची हात जोडून माफी मागा अन्यथा एअरपोर्टवरुन बाहेर पडू देणार नाही, पक्षाचा आदेश असला तरीही मागे हटणार नाही, असा धमकीवजा इशारा दिला आहे. दरम्यान, अद्याप राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागितली नसल्याने बृजभूषण आक्रमक झाले आहेत. राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करत त्यांनी भव्य रॅली काढली आहे. बाळासाहेब ठाकरे हे मोठे नेते होते. त्यांनीही उत्तर भारतीयांविरोधात केलेल्या एका वक्तव्यावर माफी मागितली होती (Balasaheb Thackeray had also apologized to the North Indians) असा दावा बृजभूषण सिंह यांनी या रॅलीदरम्यान केला आहे.
राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करत बृजभूषण सिंह यांनी नवाबगंज ते नंदिनीनगर रॅली काढली आहे. रॅलीत मोठय़ा संख्येने कार्यकर्ते राज ठाकरेंविरोधात घोषणाबाजी करत आहेत. यावेळी बृजभूषण म्हणाले, बाळासाहेब ठाकरे हे मोठे नेते होते. तरीही त्यांनी उत्तरप्रदेशांविरोधात केलेल्या एका वक्तव्यावर माफी मागितली होती. माफी मागितल्याने कोणी मोठा होत नाही. त्यामुळे राज ठाकरेंनीही माफी मागावी. राज ठाकरे दबंग नाही तर उंदीर आहेत. पहिल्यांदा बाहेर येत आहेत. माझं म्हणणं ऐकलं नाही तर त्यांना बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड आणि छत्तीसगडमध्ये आयुष्यात पाऊल ठेवू देणार नाही.
दरम्यान, राज ठाकरेंना अयोध्येत येण्यापासून रोखण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. राज ठाकरेंच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज साधू महंतांशी बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीला 50 हजार लोक उपस्थित राहतील, असेही सांगण्यात येते.