आळंदी, पुणे / प्रतिनिधी :
साडे तीन मुहुर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेनिमित्त संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीवर चंदनउटीमधून बळीराजा पांडुरंग असे सावळे साजिरे रूप शनिवारी साकारण्यात आले. त्यानंतर ही चंदनउटी भाविकांना दर्शनाकरिता खुली करण्यात आली. यावेळी आळंदी व पंचक्राशीतील भाविकांनी दर्शनाकरिता मोठी गर्दी केली.
अक्षय्य तृतीयानिमित्त शनिवारी (दि.22) पहाटे चार वाजता माऊली मंदिरातील धार्मिक कार्यक्रमांना घंटानादाने सुरुवात झाली. साडे चार वाजेपर्यंत काकडा झाल्यानंतर श्रीं ना पवमान अभिषेक व दुधारती करण्यात आली. दुपारी चार त सायंकाळी पाच या वेळेत प्रवचन झाले. त्यानंतर दुपारी अडीच वाजता माऊलींच्या संजीवन समाधीवर चंदनउटी साकारण्यासाठी समाधी दर्शन बंद ठेवण्यात आले. चंदनउटीतून विठ्ठलाचे साजिरे रुप साकारल्यानंतर सायंकाळी सहा वाजता भाविकांना हे रूप दर्शनाकरिता खुले करण्यात आले. दरम्यान सायंकाळी पाच ते सात या कालावधीत कारंजा मंडपात हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. रात्री नऊ वाजता धुपारती होऊन कार्यक्रमाची सांगता झाली. याकरिता श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त व कर्मचारी वृंद यांनी विशेष परिश्रम घेतले.