पर्यटकांनी फिरविली पाठ : मच्छीमारांनाही होतोय त्रास
प्रतिनिधी /मडगाव
पावसाळा जवळ आला की, गोव्यातील व खास करून सासष्टीतील किनारपट्टीवर तेलतवंग तसेच तेलतवंगाचे गोळे येतात आणि त्यामुळे किनारपट्टी काळी ठिक्कर पडते. या समस्येवर ठोस उपाय काढणे अद्याप शासकीय यंत्रणेला शक्य झालेले नाही. गेली कित्येक वर्षे ही समस्या बनून राहिली आहे.
बाणावलीपासून केळशीपर्यंतच्या किनारपट्टीवर गेल्या तीन-चार दिवसांपासून तेलतवंग येऊ लागले आहेत. त्यामुळे किनारपट्टी काळी ठिक्कर पडली आहे. तेल तवंग आल्याने किनारपट्टीवर फिरणे देखील कठीण होऊन बसले आहे. किनारपट्टी काळी ठिक्कर पडल्याने पर्यटकांनी देखील किनारपट्टीकडे पाठ फिरविली आहे. स्थानिक मच्छीमारांनी देखील त्यांच्या व्यवसायवर विपरित परिणाम होऊ लागल्याची माहिती दिली आहे.
गेल्यावर्षीही आले होते तेलतवंगाचे गोळे
खोल समुद्रात तेलवाहू जहाजांची स्वच्छता केली जात असल्याने हे तेलतवंग निर्माण होत असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरवर्षी पावसाळाच्या पूर्वी असे तेल तवंग निर्माण होण्याचे प्रकार सुरूच आहे. गेल्या वर्षी अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी पर्यटन खात्याने दखल घेत समुद्र किनारे साफ करण्याचे काम हाती घेतले होते.
तेल तवंगाचे गोळे निर्माण झाले असून उन्हामुळे ते चिकट बनतात, त्यामुळे पर्यटक आंघोळीसाठी समुद्रात उतरू शकत नाही. पर्यटक समुद्रकिनाऱयापासून दूर राहणे पसंत करू लागले आहेत. सलग चार-पाच दिवस तेल तवंग आल्यानंतर त्याचे प्रमाण कमी होत जाते. मात्र, काळी पडलेली किनारपट्टी साफ करण्याचे काम हाती घ्यावे लागते.