जिल्हय़ात 1.5 लाख विद्यार्थ्यांचा अंडय़ांना नकार
प्रतिनिधी /बेळगाव
श्रावण महिना हा सणासुदीचा महिना म्हणून ओळखला जातो. या महिन्यात सहसा मांसाहार टाळला जातो. त्यामुळे या सर्वाचा परिणाम अंडी व चिक्की वितरणावर झाला आहे. बेळगाव जिल्हय़ात 3.24 लाख विद्यार्थ्यांनी केळी व शेंगदाणा चिक्कीची मागणी केली तर 1.5 लाख मुलांनी अंडय़ांना नकार दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
विद्यार्थ्यांमधील कुपोषण कमी व्हावे, यासाठी राज्य सरकारकडून प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत अंडी वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. जे विद्यार्थी अंडी खाणार नाहीत, त्यांच्यासाठी शेंगदाणा चिक्की व अंडी दिली जाणार आहेत. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात अंडी वितरणाला सुरुवात झाली. परंतु पुढच्याच आठवडय़ात श्रावण महिना सुरू झाल्याने अंडी खाणाऱयांची संख्या कमी होऊन चिक्की व केळय़ांना मागणी वाढली आहे.
शिक्षण आणि जिल्हा पंचायत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेच्या आकडेवारीनुसार जुलै महिन्यात सरकारी व विनाअनुदानित शाळांमधील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांपैकी 3 लाख 25 हजार 359 विद्यार्थ्यांनी अंडी, 93 हजार 791 विद्यार्थ्यांनी केळी तर 82 हजार 214 विद्यार्थ्यांनी शेंगा चिक्कीला प्राधान्य दिले होते.
ऑगस्ट महिन्यात मात्र ही संख्या घटलेली दिसून आली. 3 ऑगस्ट रोजी 5 लाख 641 विद्यार्थ्यांपैकी 1 लाख 76 हजार 140 विद्यार्थ्यांनी अंडी, 1 लाख 2 हजार 311 विद्यार्थ्यांनी केळी तर 1 लाख 39 हजार 449 विद्यार्थ्यांनी चिक्की खाल्याचे समोर आले आहे. यामुळे श्रावण महिन्यात अंडय़ांना मागणी कमी असल्याचे दिसून आले.
तपशील टक्केवारीत
आहार | जुलै | ऑगस्ट |
अंडी | 64.89 | 35.18 |
केळी | 18.71 | 20.44 |
शेंगा चिक्की | 16.4 | 27.85 |
पदार्थांच्या मागणीत चढ-उतार
राज्य सरकारच्या आदेशानुसार विद्यार्थ्यांना त्यांच्या इच्छेनुसार पोषक आहार दिला जात आहे. एकदा अंडी मागणारे विद्यार्थी दुसऱयावेळी चिक्की व केळी मागत आहेत. त्यामुळे दर आठवडय़ाला मागणीत चढ-उतार होत आहे. श्रावण महिन्यात अंडय़ांना मागणी कमी असल्याचे त्यांनी सांगितले.
-लीलावती हिरेमठ (प्रमुख जिल्हा मध्यान्ह आहार योजना)