पावनखिंड रणसंग्रामाची तरुणांना दिली माहिती : पावसाची तमा न बाळगता पिरनवाडी-मच्छे भागात शिवप्रेमींची मोठी उपस्थिती
वार्ताहर /किणये
पिरनवाडी-मच्छे भागात बुधवार दि. 13 रोजी बांदल सेना शौर्य दिवस गांभीर्याने पाळण्यात आला. पावनखिंड रणसंग्रामातील शूरवीरांना अभिवादन करून त्यांच्याबद्दलची माहिती तरुण पिढीला देण्यात आली. शूरवीरांना मानवंदना देण्याचा पहिल्यांदाच या भागात कार्यक्रम राबविण्यात आला. याला परिसरातील शिवप्रेमी तरुण-तरुणींनी उदंड प्रतिसाद दिला.
पिरनवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे बुधवारी सकाळी 7 वाजता सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला शिवसेनेचे रत्नागिरी येथील माजी आमदार सुभाष बने यांचे चिरंजीव रोहन बने यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी बेळगाव येथील नाभिक समाजाचे प्रमुख महादेव वाघमारे आणि शहापूर नाभिक समाजाचे प्रमुख संजय भोगुलकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले.
‘पावनखिंड’ या मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर महाराष्ट्रासहीत सीमाभागात पावनखिंड रणसंग्रामाचा इतिहास प्रत्येकापर्यंत पोहोचला. जीवाची पर्वा न करता स्वराज्यासाठी लढणारे वीर योद्धे बाजीप्रभू देशपांडे, फुलाजीप्रभू देशपांडे, शिवा काशिद यांची नावे आणि पराक्रम साऱयांच्याच परिचयाचा आहे. त्यांचे बलिदान स्वराज्याच्या इतिहासात कायम आहे. मात्र, त्यांच्या सोबतच रायाजी बांदल, कोयाजी बांदल व इतर 300 बांदल पराक्रमाची शर्थ करू लढले. त्यांच्याबद्दलचा इतिहास अनेकांना माहीत नाही. या बांदल सेनेच्या शौर्यगाथेची माहितीही या कार्यक्रमात देण्यात आली.
बुधवारी सकाळी पिरनवाडी परिसरात मुसळधार पाऊस सुरू होता. तरीही पावसाची तमा न बाळगता या परिसरातील शिवप्रेमी छत्री व रेनकोट घेऊन कार्यक्रमाला उपस्थित होते. यावरून छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे मावळे यांच्याप्रती त्यांची आस्था दिसून आली. छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातींच्या मावळय़ांना एकत्र घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. आता गरज आहे ती छत्रपती शिवरायांचे आचारविचार आचरण्यात आणण्याची आणि त्यांच्या मावळय़ांकडून प्रेरणा घेण्याची, असे संतोष जैनोजी यांनी सांगितले.
रोहन बने यांनी पावनखिंडमधील युद्धाबद्दल सविस्तर माहिती दिली. या युद्धासंदर्भात माहिती देताना उपस्थित प्रत्येकाचे अंग शहारले होते. यावेळी विनायक चौगुले व इतरांची भाषणे झाली. यावेळी रमाकांत कोंडुसकर आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते. पिरनवाडी, मच्छे, खादरवाडी, किणये, झाडशहापूर येथील शिवप्रेमींनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सूत्रसंचालन राजू मुचंडीकर यांनी केले. विजयानंद नेसरकर यांनी आभार मानले.