मेहदी हसन मिराज-रहमानची शेवटच्या गडय़ासाठी विक्रमी भागीदारी
वृत्तसंस्था/ मिरपूर
प्रारंभी व मधल्या षटकांत उत्तम गोलंदाजी करूनही अखेरच्या टप्प्यात केलेली दिशाहीन गोलंदाजी, गचाळ क्षेत्ररक्षण, निष्प्रभ फलंदाजी आणि सामनावीर मेहदी हसन मिराज व मुस्तफिजूर रहमान यांनी सनसनाटी फलंदाजी करीत दहाव्या गडय़ासाठी केलेली अभेद्य अर्धशतकी भागीदारी यामुळे भारताला येथे झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात यजमान बांगलादेशकडून केवळ एका गडय़ाने पराभव स्वीकारावा लागला. मिराज व रहमान या जोडीने शेवटच्या गडय़ासाठी नाबाद 51 धावांची विक्रमी भागीदारी नोंदवत विजय खेचून आणला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवून दिली.
187 धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम मारा करीत बांगलादेशची स्थिती 3 बाद 95 वरून 9 बाद 136 अशी केली होती. पण आठव्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या मेहदी हसन मिराजने मुस्तफिजूर रहमानच्या साथीने शेवटच्या गडय़ासाठी अभेद्य 51 धावांची भागीदारी करीत विजय साकार करून भारताला चकित केले. हसनने 39 चेंडूत 4 चौकार, 2 षटकारांसह नाबाद 38 धावा फटकावल्या तर रहमान 10 धावांवर नाबाद राहिला. हसनने हुशारीने फलंदाजी करीत आपल्याकडेच जास्तीत जास्त स्ट्राईक राहील याची दक्षता घेत संघाला 46 व्या षटकात विजय मिळवून दिला. त्याला नशिबाचीही साथ मिळाली. 43 व्या षटकात शार्दुल ठाकुरच्या गोलंदाजीवर यष्टिरक्षक केएल राहुलने त्याचा अगदी सोपा झेल सोडला आणि येथेच सामना भारताच्या हातातून निसटला. यावेळी बांगलादेशला 32 धावांची गरज होती. हसन व रहमान यांनी नोंदवलेली 51 धावांची भागीदारी ही बांगलादेशतर्फे दहाव्या गडय़ासाठी नेंदवलेली सर्वोच्च भागीदारी आहे. तसेच एकंदर वनडेतील ही चौथ्या क्रमांकाची सर्वोच्च भागीदारी आहे.
दोनशेहून अधिक धावांचे संरक्षण करताना भारतीय गोलदांज नेहमीच अडखळताना दिसतात. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने (32 धावांत 2) दीपक चहर, कुलदीप सेन, ठाकुर यांच्या साथीने तसेच ऑफस्पिनर वॉशिंग्टनच्या अप्रतिम माऱयावर भारताला विजय जवळपास मिळवूनच दिला होता. शिस्तबद्ध गोलंदाजीमुळे यजमानांची स्थिती 9 बाद 136 अशी झाली होती. यानंतर मात्र हसनच्या फटकेबाजीमुळे भारतीय गोलंदाज हतबल झाले. त्यांना गचाळ क्षेत्ररक्षणाची साथ मिळाल्याने त्याचा लाभ हसन व रहमान यांनी उठवला आणि बांगलादेशला एक संस्मरणीय विजय मिळवून दिला.
राहुलचे अर्धशतक
त्याआधी स्पिन व जलद गोलंदाजीला समान साथ देणाऱया खेळपट्टीवर शकीब हसन व इबादत हुसेन यांच्या भेदक माऱयापुढे भारताचा डाव 41.2 षटकांत 186 धावांत आटोपला. रोहित शर्मा (27), शिखर धवन (7), कोहली (9) पुन्हा एकदा स्वस्तात बाद झाले तर शेवटच्या सहा फलंदाजांनी फक्त 34 धावांची भर घातली. इतर फलंदाज झगडत असताना केवळ केएल राहुलने अर्धशतकी खेळी करीत 70 चेंडूत 7 चौकार, 4 षटकारांसह 73 धावा फटकावल्या. शकीब हसनने 36 धावांत 5, इबादत हुसेनने 47 धावांत 4 बळी मिळविले तर मेहदी हसन मिराजने एक बळी मिळविला. शकीबची ही पाच बळी मिळविण्याची चौथी वेळ आहे.
11 व्या षटकात 3 बाद 49 अशी स्थिती असताना राहुलने श्रेयस अय्यरसमवेत 43 धावांची भर घातली. इबादतने उसळत्या चेंडूवर अय्यरला बाद केल्यानंतर वॉशिंग्टन सुंदरनेही राहुलला बऱयापैकी साथ दिली आणि दोघांनी 60 धावांची भागीदारी केली. यानंतर इतर फलंदाजांना स्वस्तात गुंडाळत बांगलादेशने 42 व्या षटकात भारताचा डाव संपुष्टात आणला. या मालिकेतील दुसरा सामना याच ठिकाणी 7 डिसेंबर रोजी होणार आहे.
संक्षिप्त धावफलक ः भारत 41.2 षटकांत सर्व बाद 186 ः रोहित शर्मा 27 (31 चेंडूत 4 चौकार, 1 षटकार), धवन 7, कोहली 9, अय्यर 24 (39 चेंडूत 2 चौकार), राहुल 73 (70 चेंडूत 7 चौकार, 4 षटकार), सुंदर 19 (43 चेंडू), सिराज 9, अवांतर 14. गोलंदाजी ः शकीब हसन 5-36, इबादत हुसेन 4-47, मिराज 1-43.
बांगलादेश ः 46 षटकांत 9 बाद 187 ः लिटॉन दास 41 (63 चेंडूत 3 चौकार, 1 षटकार), अनामुल हक 14 (29 चेंडूत 2 चौकार), शकीब हसन 29 (38 चेंडूत 3 चौकार), रहीम 18, मेहमुदुल्लाह 14, मेहदी हसन नाबाद 38 (39 चेंडूत 4 चौकार, 2 षटकार), रहमान नाबाद 10 (11 चेंडूत 2 चौकार), अवांतर 17. गोलंदाजी ः सिराज 3-32, सुंदर 2-17, कुलदीप सेन 2-37, ठाकुर 1-21, चहर 1-32.