अक्षर पटेलची अवघ्या 35 चेंडूत 64 धावांची निर्णायक खेळी, भारताचा 2-0 फरकाने एकतर्फी मालिकाविजय
पोर्ट ऑफ स्पेन / वृत्तसंस्था
‘बापू’ या टोपण नावाने ओळखल्या जाणाऱया अक्षर पटेलने अवघ्या 35 चेंडूत नाबाद 64 धावांची आतषबाजी केल्यानंतर भारताने विंडीजविरुद्ध दुसऱया वनडे सामन्यात धमाकेदार विजय संपादन केला आणि 3 सामन्यांची ही मालिका 2-0 अशा एकतर्फी फरकाने खिशात घातली. प्रारंभी, विंडीजने निर्धारित 50 षटकात 6 बाद 311 धावांचा डोंगर जरुर रचला. पण, प्रत्युत्तरात भारताने 49.4 षटकात 8 बाद 312 धावांसह दणकेबाज विजय मिळवला.
विजयासाठी 312 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ एकवेळ 38.4 षटकात 5 बाद 205 अशा बिकट स्थितीत होता. पण, एकापेक्षा एक सरस षटकार फटकावणाऱया अक्षर पटेलने पाहता पाहता सामन्याचे सर्व चित्र पालटून टाकले. त्याने 33 धावा जमवणाऱया दीपक हुडासमवेत 33 चेंडूत जलद 51 धावा फटकावल्या. त्यापूर्वी, श्रेयस अय्यर (63) व संजू सॅमसन (54) यांनी विंडीजच्या गोलंदाजांचा उत्तम समाचार घेतला होता.
प्रारंभी, यजमान संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर शाय होपने 135 चेंडूत 115 धावांची खेळी साकारली तर कर्णधार निकोलस पूरनने 77 चेंडूत 74 धावांच्या खेळीत 6 षटकार व 1 चौकार वसूल केले. प्रत्युत्तरात शुभमन गिल (43) उत्तम बहरात दिसून आला. त्याने 49 चेंडूंच्या खेळीत 5 चौकार फटकावले. कर्णधार शिखर धवनला (13) मात्र स्वस्तात परतावे लागले. रोमारिओ शेफर्डच्या गोलंदाजीवर थर्डमॅनवर तैनात मेयर्सने अप्रतिम झेल टिपत धवनची खेळी संपुष्टात आणली. अय्यर व सॅमसन यांनी 94 चेंडूत 99 धावांची भागीदारी केली. मात्र, हे दोघेही बाद झाले, त्यावेळी भारताला उर्वरित 11 षटकात आणखी 105 धावांची आवश्यकता होती.
संक्षिप्त धावफलक
विंडीज ः 50 षटकात 6 बाद 311 (शाय होप 135 चेंडूत 8 चौकार, 3 षटकारांसह 115, निकोलस पूरन 77 चेंडूत 1 चौकार, 6 षटकारांसह 74, काईल मेयर्स 23 चेंडूत 6 चौकार, 1 षटकारासह 39, ब्रूक्स 36 चेंडूत 5 चौकारांसह 35. अवांतर 15. शार्दुल ठाकुर 7 षटकात 3-54, दीपक हुडा, अक्षर पटेल, यजुवेंद्र चहल प्रत्येकी 1 बळी).
भारत ः 49.4 षटकात 8 बाद 312 (अक्षर पटेल 35 चेंडूत 3 चौकार, 5 षटकारांसह नाबाद 64, श्रेयस अय्यर 71 चेंडूत 4 चौकार, 1 षटकारासह 63, संजू सॅमसन 51 चेंडूत 3 चौकार, 3 षटकारांसह 54. अवांतर 19. अल्झारी जोसेफ 10 षटकात 2-46, काईल मेयर्स 7.4 षटकात 2-48, सीलेस, शेफर्ड, अकिल होसेन प्रत्येकी 1 बळी).
शेवटच्या 3 चेंडूत 6 धावांची आवश्यकता आणि अक्षरचा सनसनाटी उत्तुंग षटकार!
भारताला शेवटच्या टप्प्यात विजयासाठी 3 चेंडूत 6 धावांची आवश्यकता होती आणि यावेळी अक्षर पटेल स्ट्राईकवर होता. त्याने काईल मेयर्सला सरळ त्याच्या डोक्यावरुन षटकारासाठी भिरकावून दिले आणि विजयावर शिक्कामोर्तब करुन दिले.
अक्षर म्हणाला, एकाग्रतेने, संयमाने खेळल्यामुळेच विजय खेचून आणता आला!
माझी आजची इनिंग खऱया अर्थाने स्पेशल होती. याचे कारण असे की, ती अतिशय गरजेच्या वेळी आकारास आली. आम्ही अशाच रितीने आयपीएलमध्येही काही सामने जिंकून दिले आहेत. वास्तविक, मी येथे 5 वर्षांनंतर प्रथमच वनडे क्रिकेट खेळत होतो. पण, संयम आणि एकाग्रतेचा उत्तम मिलाफ साधता आल्याने मला विजय मिळवून देणे शक्य झाले, असे अक्षर पटेल याप्रसंगी म्हणाला.
उत्तम सांघिक खेळामुळे आम्ही येथे दणकेबाज विजय संपादन करु शकलो. श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, अक्षर पटेल या सर्वांनीच आपली जबाबदारी चोख पार पाडली. अगदी वनडे पदार्पणाच्या लढतीत अवेश खानने दिलेले 11 धावांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले.
-भारतीय कर्णधार शिखर धवन
षटकनिहाय धावसंख्या
संघ / 15 षटके / 30 / 40 / 50
विंडीज / 1-94 / 3-165 / 3-218 / 6-311
भारत / 1-65 / 3-162 / 5-212 / 8-312 (49.4)