ऑनलाईन टीम / तरुण भारत :
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. जम्मू-काश्मीर पोलीस आणि 52 आरआरची लष्करी तुकडी दशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देत आहे. या चकमकीत सुरक्षा दलांनी तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं असून, दहशतवाद्यांच्या गोळीबारात एक पोलीस शहीद झाला आहे.
आयजीपी काश्मीर विजय कुमार यांनी सांगितले की, मागील तीन ते चार महिन्यांपासून दहशतवादी बारामुल्ला भागात सक्रिय होते. सुरक्षा दल त्यांच्यावर सतत लक्ष ठेवून होते. आज सकाळी शोधमोहिमेदरम्यान ही चकमक सुरू झाली असून, सुरक्षा दलांनी जैश-ए-मोहम्मदशी संबंधित तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांना ठार केले आहे. या चकमकीत एक पोलीसही शहीद झाला आहे. ठार झालेल्या दहशतवाद्यांच्या ताब्यातून पोलिसांनी शस्त्रे, दारूगोळा आणि आक्षेपार्ह साहित्य जप्त केले आहे. या वर्षी आतापर्यंत 22 पाकिस्तानी दहशतवादी ठार झाले आहेत.