जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांचे मत
प्रतिनिधी /बेळगाव
जगज्योती बसवेश्वरांनी जात, धर्म, लिंग, भेदाचा नेहमीच तिरस्कार केला आहे. त्यांनी लिहिलेल्या वचनांमध्ये चोऱया, मारामारी व इतर वाईट कृत्ये करणाऱयांचा तिरस्कार केला आहे. त्यांनी दिलेल्या मार्गावर तरुणांनी वाटचाल करणे गरजेचे आहे, असे मत जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी व्यक्त केले.
मंगळवारी बसवेश्वर उद्यानामध्ये बसवेश्वर जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. बसवेश्वरांनी समाजाचे परिवर्तन करण्यासाठी मोठे परिश्रम घेतले आहेत. बाराव्या शतकामध्ये त्यांनी वर्णभेद, लिंगभेद दूर करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. ही बाब प्रत्येकाने लक्षात घेणे गरजेचे आहे. बसवेश्वरांच्या विचारांची आज नितांत गरज निर्माण झाली आहे. यावेळी डॉ. के. सी. नावलगी यांनीही आपले विचार व्यक्त केले.
प्रारंभी खासदार मंगला अंगडी, आमदार अनिल बेनके, जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, महानगरपालिका आयुक्त रुदेश घाळी, कन्नड आणि संस्कृतिक खात्याच्या साहाय्यक संचालिका विद्यावती बजंत्री यांच्या हस्ते बसवेश्वरांच्या पुतळय़ाला पुष्पहार अर्पण करण्यात आले.
या कार्यक्रमाला कृषी खात्याचे सहसंचालक शिवनगौडा पाटील, बेळगावचे तहसीलदार आर. के. कुलकर्णी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. प्रारंभी विद्यावती बजंत्री यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. आभार सर्वमंगल अरळीमट्टी यांनी मानले.