वारसा हक्क चढविण्यासाठी 4 हजारांची मागणी : गुन्हा दाखल
प्रतिनिधी / खानापूर
तालुक्यातील निट्टूर ग्राम पंचायतीच्या पीडीओ श्रीदेवी गुंडापूर व क्लार्क सिद्धाप्पा नाईक यांना लाच घेताना रंगेहाथ पकडून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (अँटी करप्शन ब्युरो) कारवाई केली. दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभूनगर येथील रामचंद्र पाटील यांच्या तक्रारीवरून सदर कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे खानापूर तालुक्यात खळबळ माजली आहे.
निट्टर ग्रा. पं. कार्यक्षेत्रातील प्रभूनगर येथील रामचंद्र पाटील यांचे वडील गंगाराम पाटील यांचे निधन झाले होते. त्यांच्या सर्व्हे नंबर 154 येथील घर नंबर 90 या घरावर वारसा हक्काप्रमाणे नाव दाखल करण्यासाठी रामचंद्र पाटील यांनी रितसर अर्ज केला होता. हे नाव दाखल करण्यासाठी पीडीओ आणि क्लार्क यांनी मोठय़ा रकमेची मागणी केली होती.
यासाठी रामचंद्र पाटील हे सातत्याने ग्राम पंचायतीला हेलपाटे मारत होते. मात्र काम होत नसल्याने शेवटी चार हजार रुपये देण्याचे ठरवण्यात आले होते. रामचंद्र पाटील यांनी गुरुवार दि. 11 रोजी सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात तक्रार दाखल केली. तक्रारीची तात्काळ दखल घेऊन रामचंद्र पाटील यांना पैसे देण्यास पंचायतीत पाठवण्यात आले व सापळा रचण्यात आला. लाच घेतल्याक्षणी लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱयांनी कारवाई करून पीडीओ श्रीदेवी गुंडापूर व क्लार्क सिद्धाप्पा नाईक यांना रंगेहाथ पकडले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक बी. एस. नेमगौड, उपाध्यक्ष व्ही. एन. करुणाकर शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक ए. एस. गुद्दीगोप्प, निरंजन पाटील यांच्यासह इतर कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले होते.
पंचायतीसह शासकीय कार्यालयात मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार
तालुक्यातील ग्राम पंचायतीसह शासकीय कार्यालयात मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असून या भ्रष्टाचारात सामान्य जनता भरडून निघत आहे. गेले अनेक वर्षे पीडीओ व क्लार्क तसेच इतर शासकीय कार्यालयातील कर्मचारी एकाच ठिकाणी ठाण मांडून असल्याने हे कर्मचारी कुणालाही जुमानत नाहीत. परिणामी सामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. तालुक्यातील अनेक ग्राम पंचायतींबाबत रोहयोंतर्गत भ्रष्टाचाराच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र याची दखल घेण्यात आली नाही. वरिष्ठ अधिकारी थातूरमाथूर चौकशी करून या तक्रारींचा निपटारा करतात. तसेच पंचायतीतील कामासाठी सामान्य नागरिकांना हेलपाटे मारावे लागत असून नागरिकांची मोठय़ा प्रमाणात आर्थिक पिळवणूक होत आहे. याबाबतही अनेक संघटनांनी तक्रारी व निवेदनेही दिली आहेत. याचीही दखल घेण्यात येत नसल्याने अधिकारी व कर्मचारी माजलेले आहेत. त्यामुळे सामान्य जनतेला याचा फटका बसत आहे. या झालेल्या कारवाईने तरी पंचायतींचा कारभार सुधारेल का, असा प्रश्न सामान्य जनतेतून उपस्थित केला जात आहे.