सहा महिन्यांत रेल्वेमध्ये 11 मृत्यू
पाच अपघात, 3 आत्महत्या,3 नैसर्गिक मृत्यू
कोल्हापूर / बाळासाहेब उबाळे
गतवर्षात कोल्हापूर- मिरज रेल्वे मार्गावर विविध कारणांनी 14 जणांचा मृत्यू झाला होता. यंदा मात्र सहा महिन्यांतच 11 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पाच अपघात, तीन आत्महत्या आणि तीन नैसर्गिक मृत्यूंचा समावेश आहे.रेल्वे दुर्घटनेत दरवर्षी अनेकांचा जीव जातो. कित्येक जखमी होतात.बऱ्याचदा प्रवासादरम्यानचा निष्काळजीपणा प्रवाशांच्या जीवावर बेततो. काहीजण धावत्या रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्या करतात. रेल्वे रुळ ओलांडताना अपघात होऊन मृत्यू होण्याची संख्या वाढत आहे. रेल्वे रुळावर तसेच रेल्वेमध्ये झालेल्या मृत्यूची नोंद रेल्वेच्या लोहमार्ग पोलीस ठाण्यात होते.
गतवर्षी, 2021 मध्ये कोल्हापूर-मिरज दरम्यान फक्त 14 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद कोल्हापूर लोहमार्ग पोलीस ठाण्यात झाली आहे. त्या वर्षात कोरोनामुळे सर्व रेल्वे गाडय़ा बंद होत्या. त्यामुळे या मृत्यूमध्ये घट दिसून आली. पण रेल्वे सेवा सुरु झाल्यानंतरच्या काळात 14 मृत्यू झाले आहेत. कोरोना संपला आणि कोल्हापूरातून विविध मार्गावर रेल्वे धावू लागल्या. यामुळे मृत्यूही वाढले आहेत. मार्च, एप्रिल आणि जून महिन्यात प्रत्येकी एक अपघाती मृत्यू झाला आहे. तर मे महिन्यात दोन अपघाती मृत्यू झाले. मार्च, एप्रिल महिन्यात प्रत्येकी एक असे दोन नैसर्गिक मृत्यू झाले. तर मे महिन्यात 1 आणि जून महिन्यात 2 अशा तिघांनी रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्या केल्याची नोंद लोहमार्ग पोलीस ठाण्यात झाली आहे. या मृत्यूपैकी आठ जणांची ओळख पटली असून तिघांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेण्यात येत आहे.
रेल्वे रुळ ओलांडू नये…
रेल्वेच्या नियमाप्रमाणे रुळ ओलांडण्यास मनाई आहे. तरीही पादचारी जीव धोक्यात घालून रुळ ओलांडतात. यामुळे रेल्वेखाली सापडून अपघाती मृत्यू होतो. रेल्वे प्रवासादरम्यान, काही प्रवासी स्टंट करण्याच्या नावाखाली दरवाजात उभे राहून प्रवास करतात. त्यामुळे रेल्वेतून पडून मृत्यू होतात. धावत्या रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्त्येच्या घटना घडतात. सहा महिन्यांत कोल्हापूर लोहमार्ग पोलीस ठाण्यात अशा 11 मृत्यूची नोंद झाली आहे. पादचाऱयांनी रेल्वे रुळावरुन रहदारी करु नये.
महिना
मार्च एप्रिल मे जून
अपघात 1 1 2 1
नैसर्गिक 1 2 – –
आत्महत्या – – – 1