आ. शिवेंद्रराजे, तातडीने लसीकरण पूर्ण करण्याच्या दिल्या सूचना
सातारा- ‘लम्पी’ या साथरोगाने पशुधन धोक्यात आले असून शेतकरी हवालदील झाला आहे. सातारा आणि जावली तालुक्यातील प्रत्येक जनावराला लस द्या. औषधे कमी पडत असतील तर मी उपलब्ध करून देतो पण, लम्पी आजाराने जनावरे दगावणार नाहीत याची कटाक्षाने काळजी घ्या, तातडीने लसीकरण पूर्ण करा, अशा सक्त सूचना आ. श्री शिवेंद्रराजे भोसले यांनी पशुसंवर्धन विभागाला दिल्या.
सातारा पंचायत समितीमध्ये आ. शिवेंद्रराजेंच्या अध्यक्षतेखाली लम्पी प्रादुर्भावाच्या संदर्भाने सातारा आणि जावली तालुक्यातील जनावरांचे लसीकरण, झालेला प्रादुर्भाव आणि करण्यात येत असलेल्या उपाययोजना यासंदर्भात महत्वाची बैठक झाली. या बैठकीत आ. शिवेंद्रराजे बोलत होते. यावेळी सातारचे तहसीलदार राजेंद्र जाधव, जावलीचे तहसीलदार राजेंद्र पोळ, सातारा पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी सुवर्णा चव्हाण, जावलीचे गट विकास अधिकारी रमेश काळे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजू भोसले, प्रतीक कदम, पंचायत समितीचे माजी उपाध्यक्ष अरविंद जाधव, माजी सदस्य राहुल शिंदे, जितेंद्र सावंत, पशुसंवर्धन विभागाचे डॉ. अंकुश परिहार, डॉ. संजय शिंदे, डॉ. विजय सावंत, डॉ. सुयोग्य वाघ आदी अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत सातारा आणि जावली तालुक्याच्या अधिकाऱ्यांनी लम्पी प्रादुर्भावाबाबत सविस्तर माहिती दिली. यांनतर आ. शिवेंद्रराजे म्हणाले, शेतकऱ्यांचे पशुधन वाचविणे खूप महत्वाचे आहे. त्यामुळे जनावरांना प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आवश्यक ती खबरदारी पशुसंवर्धन विभागाने घ्यावी. शेतकऱ्यांनीही जनावरे आणि त्यांचा गोठा स्वच्छ ठेवावा. दुर्दैवाने या साथरोगाने जनावराचा बळी गेल्यास आठ दिवसांच्या आत पंचनामा झाला पाहिजे आणि तातडीने संबंधित शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, याची दक्षता संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी. प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण हाच पर्याय असल्याने सर्व जनावरांचे लसीकरण तातडीने पूर्ण करा. लस, स्प्रे आणि गोळ्यांचा तुटवडा असेल तर, सर्व औषधे मी उपलब्ध करून देतो पण, शेतकऱ्यांचे पशुधन वाचवा, असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी केले.