पहिल्या राज्यस्तरीय बैठकीत स्वयंपूर्ण मित्रांना मार्गदर्शन : ’स्वयंपूर्ण गोवा’ योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद : विजय सक्सेना
प्रतिनिधी /पणजी
आत्मनिर्भर भारत योजनेच्या संकल्पनेतून प्रेsरणा घेऊन गोवा सरकारने लागू केलेल्या ‘स्वयंपूर्ण गोवा’ योजनेला सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून लवकरच खऱ्या अर्थाने गोव्याची वाटचाल स्वयंपूर्ततेकडे होईल, असा विश्वास योजना व सांख्यिकी खात्याचे संचालक विजय सक्सेना यांनी व्यक्त केला.
यापूर्वी राज्याने ‘स्वयंपूर्ण गोवा 1.0’ कार्यक्रम आयोजित केला होता. त्याला देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक यश मिळाले. 25 हजारांपेक्षा जास्त गोमंतकीयांना त्याचा लाभ मिळाला. आता ‘स्वयंपूर्ण गोवा 2.0’ प्रारंभ करण्यात आला असून त्याची पहिली राज्यस्तरीय बैठक मंगळवारी पणजीत आयोजित करण्यात आली. राज्यभरातील 237 स्वयंपूर्ण मित्र व 27 तालुका नोडल अधिकारी या बैठकीस उपस्थित होते. त्यांना मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी, ग्रामस्थ व सरकार यांच्यातील दुवा बनण्याचे आवाहन केले, अशी माहिती श्री. सक्सेना यांनी दिली.
समाजाच्या प्रत्येक घटकातील ग्रामस्थांना लाभ देणाऱ्या विविध योजना राबविणाऱ्या खात्यांच्या योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने स्वयंपूर्ण मित्र आणि नोडल अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याद्वारे त्यांनी ग्रामपातळीवर जाऊन प्रचार, प्रसार करावा व ग्रामस्थांना लाभ मिळवून द्यावा, असे यावेळी सांगण्यात आले.
‘स्वयंपूर्ण गोवा 1.0’ कार्यक्रमाद्वारे घर, वीज, पाणी, आरोग्य सेवा, किसान क्रेडिट कार्ड, कृषी कार्ड, पशुसंवर्धन, मत्स्य, आयुष्मान भारत, विमा योजना, यासारख्या योजनांचा लाभ समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला पाहिजे हे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. आता नव्या कार्यक्रमात सुमारे 16 मुद्दे असून त्यात प्रामुख्याने प्रत्येकाच्या अंगी असलेले कलागुण व कार्यकौशल्यतेला वाव देणे व त्यांच्यात नवा आत्मविश्वास निर्माण करणे तसेच याच योजनांच्या माध्यमातून त्यांना आर्थिक लाभही मिळवून देताना स्वयंपूर्ण करणे, असे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
आज प्रत्येकाला सरकारी नोकरी मिळू शकत नाही हे खरे असले तरी प्रत्येकाच्या अंगी काही ना काही कलागुण हे निश्चितच असतात. परंतु विविध अडचणीमुळे आपल्यातील या कलागुणांना वाव देणे त्यांना शक्य होत नसते. अशा युवा पिढीसाठी आयटीआय सारख्या संस्थांच्या माध्यमातून व्यावसायिक प्रशिक्षण देणे, किंवा अल्प कालीन प्रशिक्षण कार्यक्रम राबवून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनण्यासाठी मदत करणे, अशी योजना आहे. अनेक कुटुंबात प्लंबिंग, ऑटोमोबाईल, सुतारकाम, यासारखे व्यवसाय परंपरेने चालत आलेले असतात. त्यासंदर्भात त्यांच्याकडे तांत्रिक कौशल्य असते, परंतु पुस्तकी ज्ञान नसते, अशा युवकांसाठी हे अल्प कालीन अभ्यासक्रम खूप फायदेशीर ठरू शकतात. आज पाडेली, रेंदेर यासारख्या व्यवसायात रोजगाराच्या प्रचंड संधी आहेत. परंतु ते कौशल्य असलेली पिढी संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. नव्या पिढीने यात रस दाखविल्यास अनेकांना रोजगार प्राप्त होऊ शकतो. स्वयंपूर्ण मित्रांनी या सर्व गोष्टी हेरून त्यासाठी युवा पिढीला उद्युक्त करावे व त्यासंबंधी योजनांचा लाभ मिळवून देऊन त्यांना स्वयंपूर्ण बनवावे, असे मार्गदर्शन करण्यात आले.
अन्नप्रक्रिया, कृषी, पशुपालन, दुग्ध, फलोत्पादन, मत्स्यपालन, पोल्ट्री, यासारख्या असंख्य व्यवसायात आज रोजगाराच्या प्रचंड संधी उपलब्ध आहेत. त्यासंबंधीची संपूर्ण माहिती ग्रामपातळीवर ग्रामस्थांना करून द्यावी, तसेच सरकारी आणि वित्तीय पातळीवर कागदोपत्री प्रक्रियेत करावी, एवढेच नव्हे तर त्यांच्या उत्पादनांचे मार्केटिंग करण्यातही मदत करून या योजनांचा त्यांना लाभ मिळवून द्यावा, असे सांगण्यात आले.
प्रत्येक पात्र आणि उत्साही नागरिकास अशा योजनांसाठी प्रोत्साहित करून मदत करणे हे स्वयंपूर्ण मित्रांचे प्रमुख काम. असे मित्र प्रत्येक शनिवारी प्रत्येक ग्रामपंचायतीत उपलब्ध असतील. इच्छुक असलेल्या कोणत्याही नागरिकाने त्यांना भेटून हवी ती माहिती मिळवता येते. त्याद्वारे स्वत:साठी पात्र योजनेचा लाभ घेता येतो. हे मित्र केवळ योजनांपुरतेच मर्यादित नसून सरकार आणि नागरिक यांच्यातील ते महत्वाचा दुवा आहेत. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाच्या प्रत्येक अडचणी सोडवता येतात.
दरम्यान, या स्वयंपूर्ण मित्रांच्याही कार्याचे सरकार वेळोवेळी मोजमाप करणार असून त्यांना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी बोनसऊपी मोबदला देण्याचे वचन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले आहे. त्यामुळे पुढील वर्षापर्यंत गोव्यातील किमान एक तरी गाव सर्वदृष्ट्या स्वयंपूर्ण बनलेला पाहता येणार आहे. हेच मुख्यमंत्र्यांचे स्वप्न असल्याचे श्री. सक्सेना यांनी सांगितले.