पुणे / प्रतिनिधी :
बंगालच्या उपसागरातील तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राची शनिवारपर्यंत तीव्रता वाढणार असून, 8 मेच्या सायंकाळपर्यंत पूर्वमध्य बंगालच्या उपसागरात त्याचे वादळात रुपांतर होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. दहा दिवस आधीच भारतीय भूमीवर मान्सून दाखल होणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असतानाच आता ‘असानी’ चक्रीवादळाचे देशावर सावट निर्माण झाल्याचे दिसत आहे.
बंगालच्या उपसागरातील तीव्र कमी दाबाच्या क्षेत्र निर्माण झाले आहे. शनिवारपर्यंत त्याची तीव्रता वाढण्याची चिन्हे आहेत. त्यानंतर 8 मेच्या सायंकाळपर्यंत पूर्वमध्य बंगालच्या उपसागरात त्याचे वादळात रुपांतर होईल. या वादळाचा प्रवास उत्तर-उत्तरपश्चिमेकडे असा होणार असून, 10 मे रोजी आंध्र व ओरिसा किनारपट्टीदरम्यान ते धडकण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या संभाव्य चक्रीवादळाचे असानी असे नामकरण करण्यात आले आहे. श्रीलंकेकडून हे नाव देण्यात आले आहे.