पिंपरी / प्रतिनिधी :
शिवसेनेचे बंडखोर मंत्री, आमदारांचे बोलविते धनी हळूहळू जनतेसमोर येत आहेत. विधनसभेतील ‘फ्लोअर टेस्ट’च्या अगोदर बंडखोरांना ‘रोड टेस्ट’ ला सामोरे जावे लागणार आहे. पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठित खंजीर का खुपसला याचा जाब मतदार, शिवसैनिक विचारणार आहेत. शिवसेनेला धोका दिल्याने बंडखोरांविरोधात सर्वसामान्यांमध्ये संताप, चीड निर्माण झाली आहे. बंडखोरांनी शिवसेनेच्या आमदारकीचे राजीनामे देऊन निवडणुकीला सामोरे जावे. त्यांचे डिपॉझीट जप्त केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. बंडखोरांचा राजकीय जीवनातील संन्यास सुरु झाला आहे, असा इशारा शिवसेना पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सचिन अहिर यांनी येथे दिला.
शिवसेना पिंपरी – चिंचवड कार्यकारिणीची बैठक सोमवारी (दि.27) आकुर्डी येथे पार पडली. यावेळी सचिन अहिर यांची विधान परिषदेवर आमदार म्हणून निवड झाल्यानिमित्त युवा सेनेचे शहर युवा अधिकारी विश्वजीत बारणे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
सचिन अहिर म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्तेच आषाढीवारीची विठ्ठलाची पूजा व्हावी. अशी वारकऱ्यांची भावना आहे. कोरोना महामारीच्या दोन वर्षाच्या काळात कुटुंबप्रमुख या नात्याने उद्धव ठाकरे यांनी काम केले. महाराष्ट्राला संकटातून बाहेर काढले. त्यांच्या मागे लाखेंचे आशिर्वाद आहेत. संकटे येतील, जातील पण उद्धवसाहेबांचे कार्य हृदयात आहे. ते कोणी काढून नेवू शकत नाही, ही वारकऱ्यांची भूमिका आहे. बंडखोर आमदारांना मतदारसंघात गेल्यावर लोक भंडावून सोडतील. कशामुळे ही भूमिका घेतली, कोणते संकट तुमच्यावर कोसळले होते, याचा जाब विचारतील.