प्रतिनिधी /बेळगाव
कार्यतत्पर आणि प्रामाणिक असलेल्या प्रादेशिक आयुक्त आदित्य अम्लान बिस्वास यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. यामुळे बिम्सचा विकास थांबणार आहे. याचबरोबर त्यांनी एक वेगळा ठसा उमटविला आहे. त्यांचे कार्य उत्तम आहे. मात्र, अचानकपणे काही नेत्यांनी त्यांची बदली केली आहे. तेव्हा त्यांची बदली रद्द करावी, अशी मागणी भ्रष्टाचार निर्मूलन परिवार, विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
प्रादेशिक आयुक्त आदित्य अम्लान बिस्वास यांनी बिम्सचा कायापालट करण्यासाठी प्रयत्न केले. सरकारकडे पाठपुरावा केला. त्यामुळे विकासकामे त्या ठिकाणी सुरू झाली. मात्र, ही कामे सुरू असतानाच त्यांची अचानक बदली करण्यात आली. बिस्वास यांच्याकडे कोणीही समस्या मांडल्यास ती तातडीने सुटत होती. त्यामुळे त्यांच्यावर बेळगावच्या जनतेचा विश्वास आहे.
कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. नुकतीच झालेली विधानपरिषदेची निवडणूक पारदर्शकपणे पार पाडली. महापालिकेच्या कामाबद्दलदेखील नाराजी व्यक्त केली होती. स्मार्ट सिटीच्या कामांना गती द्या, अशी सूचना केली होती. महापालिकेच्या कामांनादेखील त्यांनी गती दिली होती. त्यांना अनेक अधिकारी घाबरून होते. मात्र, अचानकपणे त्यांची बदली झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
अशा प्रामाणिक अधिकाऱयाची बदली तातडीने थांबवावी, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला आहे. अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी भ्रष्टाचार निर्मूलन परिवार संघटनेचे अध्यक्ष सुजित मुळगुंद, म. ए. समितीचे शिवाजी सुंठकर, बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष ऍड. एन. आर. लातूर, संतोष कांबळे, सुभाष कांबळे, पी. एल. पावशे, शिवाजी चलवेटकर, जेडीएसचे मुख्तार इनामदार, कल्लाप्पा अर्जुन पाटील, कल्लाप्पा एन. पाटील, किसन सुंठकर, शकील मुल्ला, भाऊ पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.