मंत्री सुदिन ढवळीकर यांनी मांडले विचार ः गोवा क्रांती दिनानिमित्त स्वातंत्र्यवीरांचा सत्कार
प्रतिनिधी/ बेळगाव
गोमंतकीय भूमीवर अनेकांनी राज्ये केली. परंतु सर्वाधिक विध्वंस पोर्तुगीजांनी केला. 1946 मध्ये आदीलशहाने गोवा पोर्तुगीजांच्या हाती सोपविला आणि गोवा बंधनात अडकविला गेला. पोर्तुगीजांनी केवळ राज्यच केले नाही तर येथील संस्कृती, धर्म नष्ट करण्याचा प्रयत्न केला. गोव्यातील मंदिरांची नासधूस करण्यात आली. अशा अंदाधुंद परिस्थितीतून गोव्याला बाहेर काढण्यासाठी बेळगाव, सावंतवाडी, दोडामार्ग, पुणे या ठिकाणी गोवामुक्ती संग्रामाची बिजे पेरली गेली. गोव्याला जे स्वातंत्र्य मिळाले त्यामध्ये बेळगाव अग्रस्थानी होते. त्यामुळे गोमंतकीय जनता बेळगावची ऋणी आहे, असे विचार गोव्याचे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी मांडले.
एसकेई सोसायटीच्या राणी पार्वतीदेवी कॉलेजतर्फे शनिवारी 76 व्या गोवा क्रांतिदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गोवा सरकारचे प्रतिनिधी म्हणून ते बोलत होते. या क्रार्यक्रमात गोवामुक्ती संग्रामात सहभागी झालेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर एसकेई सोसायटीचे चेअरमन किरण ठाकुर, उपाध्यक्षा माधुरी शानभाग, ऍड. राम आपटे, ज्ये÷ स्वातंत्र्यसैनिक विठ्ठलराव याळगी, माजी आमदार परशुरामभाऊ नंदिहळ्ळी, राजेंद्र कलघटगी, सोमनाथ रेडकर, प्राचार्या शोभा नाईक, प्राचार्य लक्ष्मण मजूकर उपस्थित होते.
सुदिन ढवळीकर म्हणाले, डॉ. राम मनोहर लोहिया यांनी क्रांतीज्योती पेटवली. त्यामुळे जागोजागी उठाव झाले. पुण्यात काढण्यात येणारी पत्रे बेळगावमार्गे गोव्यामध्ये येत होती. कर्नाटक सिंह म्हणून ओळख असणाऱया गंगाधरराव देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली बेळगावमध्ये कमिटी स्थापन झाली आणि चोर्ला, कॅसलरॉकमार्गे आंदोलक गोवा येथे जात होते. यामध्ये आरपीडी कॉलेजची भूमिका फार मोठी होती. कॉलेजचे अनेक विद्यार्थी गोवामुक्ती संग्रामाशी जोडले गेले आहेत. या सर्वांच्या प्रयत्नाने गोवा पोर्तुगीजांच्या तावडीतून मुक्त झाला. त्यामुळे गोवा व आरपीडी कॉलेजचे ऋणानुबंध नेहमीच राहतील, असा विश्वास ढवळीकर यांनी व्यक्त केला.
गोव्याच्या विकासात बेळगावचे योगदान
किरण ठाकुर म्हणाले, गोवामुक्ती लढय़ात आरपीडी कॉलेजचे विद्यार्थी अग्रभागी होते, याचा मला कॉलेजचा विद्यार्थी म्हणून सार्थ अभिमान आहे. त्याकाळी बेळगाव हे गोवा मुक्तीलढय़ाचे मुख्य केंद्र होते. बेळगाव व गोव्याचे ऋणानुबंध अनेक वर्षांपासूनचे आहेत. ज्याकाळी गोवा शिक्षण क्षेत्रात मागे होता, त्यावेळी बेळगावमधील शिक्षक गावोगावी जावून शिक्षण देत होते. त्यामुळे गोवा आज 100 टक्के साक्षर आहे. गोव्याच्या विकासात बेळगावचे योगदान नाकारता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
गोवामुक्ती संग्रामात सहभागी झालेले ऍड. राम आपटे, ज्ये÷ स्वातंत्र्यसैनिक विठ्ठलराव याळगी, माजी आमदार परशुरामभाऊ नंदिहळ्ळी, राजेंद्र कलघटगी, सोमनाथ रेडकर यांचा सुदिन ढवळीकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. ऍड. राम आपटे यांच्या सामाजिक कार्यासाठी लोकमान्य को-ऑप. सोसायटीतर्फे 2 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. यावेळी तरुण भारतचे गोवा आवृत्तीचे निवासी संपादक सागर जावडेकर, उद्योजक संजय कुलकर्णी, झुआरी ऍग्रोचे डॉ. पाटील, मधू सामंत, लोकमान्य सोसायटीचे समन्वयक विनायक जाधव यांसह इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात नुपूर रानडे हिच्या स्वागतगीताने झाली. प्राचार्या शोभा नाईक यांनी प्रास्ताविक केले. एसकेई सोसायटीतर्फे मंत्री सुदिन ढवळीकर यांचा सत्कार करण्यात आला. ऍड. राम आपटे यांनी सत्काराला उत्तर देताना एसकेई सोसायटीचे आभार मानले. आरपीडी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीवर आधारित पथनाटय़ सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कॉलेजच्या सांस्कृतिक विभागप्रमुख पी. डी. गावडे यांनी हे पथनाटय़ बसविले होते.
अन् मंदा याळगी यांनी फडकविला गोव्यात तिरंगा
बेळगावच्या याळगी कुटुंबाचे भारताचा स्वातंत्र्यलढा व गोवामुक्ती संग्रामात योगदान आहे. गोव्याला जाणाऱया आंदोलकांसाठी याळगी यांच्या घरी शेकडो भाकऱया तयार केल्या जात होत्या. बेळगावमधील महिला आंदोलकदेखील लढय़ात सक्रिय होत्या. आशाताई पोतदार, मंदा याळगी यांनी गोवामुक्तीसाठी लढा उभारला. मंदा याळगी यांनी तर पोर्तुगीजांचा विरोध झुगारून गोव्यात तिरंगा फडकविला होता, याची आठवण किरण ठाकुर यांनी करून दिली.