रेल्वेची गती वाढणार असल्याने प्रवाशांना लाभ
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव ते धारवाड (व्हाया लोंढा) रेल्वेमार्ग दुपदरीकरणाचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. धारवाड ते लोंढा व खानापूर ते बेळगाव या रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण झाले असून, त्याचे सीआरएस करून सर्वेक्षणही झाले आहे. उर्वरित मार्गाचे काम पूर्ण झाल्यास रेल्वेची गती वाढणार असल्याने प्रवाशांनाही कमी वेळेत पोहोचता येणार आहे.
क्रॉसिंगसाठी रेल्वे थांबल्यामुळे प्रवासाचा वेळ वाढत असल्याचे रेल्वे विभागाच्या लक्षात आल्यानंतर रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. महसूल मिळवून देणाऱया मिरज ते लोंढा या रेल्वेमार्गाचे मागील दोन वर्षांपासून दुपदरीकरणाचे काम सुरू आहे. यातील एक टप्पा असणाऱया बेळगाव-धारवाड या मार्गावरील बरेचसे काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम लवकरच पूर्ण होण्याची आशा आहे.
सध्या खानापूर व गुंजी या रेल्वेस्थानकांदरम्यान रेल्वेमार्गाच्या दुरुस्तीचे काम 20 तारखेपासून सुरू करण्यात आले आहे. प्रि-इंटरलॉकिंग व इंटरलॉकिंगचे काम हाती घेण्यात आले आहे. परंतु या मार्गाचे सीआरएसद्वारे सर्वेक्षण पूर्ण झालेले नाही. गुंजी ते लोंढा या मार्गाचेही काम अंतिम टप्प्यात आहे. धारवाड ते लोंढा या मार्गाचे दुपदरीकरण व विद्युतीकरणही पूर्ण झाल्याने रेल्वेची गती वाढली आहे.
विद्युतीकरण कासवगतीने
एकीकडे रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू असताना दुसरीकडे मात्र विद्युतीकरणाचे काम संथगतीने सुरू आहे. बेंगळूर ते धारवाड या मार्गाचे दुपदरीकरण व विद्युतीकरण पूर्ण झाल्याने अनेक जलद एक्स्प्रेस या मार्गावर धावत आहेत. परंतु मिरज ते लोंढा या मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम संथगतीने सुरू असल्याने बेळगाव विभागाकडे दुर्लक्ष का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.