प्रतिनिधी /बेळगाव
खेड्यांचा संपूर्ण विकास, बेरोजगारीची समस्या व शहराकडे ग्रामीण भागातील नागरिकांचे होत असलेले स्थलांतर रोखण्यासाठी सुरू झालेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण उद्योग खात्री योजनेत बेळगाव जिल्हा राज्यात प्रथम आला आहे.
जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही. यांनी शुक्रवारी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली. जिल्ह्यात 1 कोटी 10 लाख दिवस रोजगार देण्यात आला आहे. 2020-21, 2021-22 या दोन वर्षांत 1 कोटींहून अधिक रोजगार देण्यात आले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
जिल्ह्यातील 500 ग्राम पंचायतीच्या कार्यक्षेत्रात नरेगा योजनेची कामे सुरू असून महिला, पुरुष व शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा झाला आहे.
जिल्ह्यात 7 लाख 35 जॉबकार्ड वितरित करण्यात आली आहेत. तलावांची निर्मिती, तलावांचा गाळ काढणे, शेतवडीला जाणाऱ्या रस्त्यांची कामे, शाळेचे कंपाऊंड, शाळा आवारात पेव्हर्स घालणे, मैदान, शौचालय व स्वयंपाक घर उभारणे आदी कामे हाती घेण्यात आली आहेत. खास करून वनविभागात कामे राबविण्यात आली आहेत, असे त्यांनी सांगितले.