14 तालुक्यांमध्ये 228 अमृत सरोवर : केंद्रीय जलशक्ती अभियान अधिकाऱ्यांकडून पाहणी
बेळगाव : जलसंरक्षणासाठी जिल्हा पंचायतीकडून अमृत सरोवर योजना राबविण्यात येत आहे. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेला रोजगार उपलब्ध करून देण्याबरोबरच जलसंरक्षणासाठी तलाव निर्माण करण्यात येत आहेत. यामध्ये बेळगाव जिल्हा राज्यात आघाडीवर आहे. जिल्ह्यातील 14 तालुक्यांमध्ये 228 अमृत सरोवर तलाव निर्माण करण्यात आले आहेत. जलसंरक्षणासाठी केंद्र व राज्य सरकारच्या सहयोगाने विविध योजनांच्या माध्यमातून उपक्रम राबविले जात आहेत. नुकताच जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय जलशक्ती अभियान नोडल अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील अमृत सरोवरांची पाहणी करून जि. पं. अधिकाऱ्यांच्या कामाचे कौतुक केले आहे. राज्यामध्ये बेळगाव जिल्हा अमृत सरोवर योजना राबविण्यात आघाडीवर आहे.
रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून हे तलाव निर्माण करण्यात आले आहेत. यामुळे जलसंरक्षण करण्याबरोबरच रोजगार उपलब्ध करून देण्याच्यादृष्टीने ही योजना प्रभावीपणे राबविण्यात आली आहे. या योजनेंतर्गत ग्रामीण भागातील जनतेला पाण्याची सोय करून देणे, अंतर्जल पातळी वाढविणे, जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करणे, पावसाचे पाणी वाहून न जाता पाणी जमिनीमध्ये मुरविण्यास मदत व्हावी, या उद्देशाने सदर योजना राबविली जात आहे. जि. पं. कडून ग्रामीण भागात रोजगार हमी योजना प्रभावीपणे राबवून या माध्यमातून अमृत सरोवर निर्माण करण्यात आले आहेत. नुकताच जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय जलशक्ती अभियानाच्या नोडल अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील विविध तालुक्यांना भेटी देऊन अमृत सरोवर तलावांची पाहणी करून समाधान व्यक्त केले आहे.
जिल्ह्यात काम पूर्ण झालेल्या अमृत सरोवर तलावांचा तालुकानिहाय तपशील
तालुका तलावांची संख्या
- अथणी 19
- बैलहोंगल 5
- बेळगाव 20
- चिकोडी 75
- गोकाक 14
- हुक्केरी 13
- कागवाड 1
- खानापूर 20
- कित्तूर 2
- मुडलगी 2
- निपाणी 9
- रामदुर्ग 25
- रायबाग 10
- सौंदत्ती 13
- एकूण 228