सध्या मालवाहतुकीस परवानगी
बेळगाव : बेळगाव-गोवा रेल्वेमार्गावरील दूधसागर ते सोनाळीदरम्यान 9 ऑगस्ट रोजी मालवाहू रेल्वेचे डबे ऊळावरून घसरले होते. यामुळे मागील चार दिवसांपासून रेल्वेसेवा पूर्णपणे ठप्प होती. सोमवारी रेल्वेचे डबे दूर केल्यानंतर धिम्यागतीने वाहतूक सुरू झाली. मालवाहू रेल्वेचे डबे या रेल्वेमार्गावरून नेऊन चाचणी करण्यात आली. चाचणी यशस्वी झाल्याने तुर्तास मालवाहतुकीला परवानगी असली तरी प्रवासी वाहतूक सुरू होण्यास अद्याप विलंब लागण्याची शक्यता आहे. कोळसा वाहतूक करणाऱ्या मालवाहू रेल्वेचे 17 डबे गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजता रेल्वे ऊळावरून घसरले. यामध्ये रेल्वेमार्गाचे मोठे नुकसान झाल्याने बेळगाव-गोवा रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. नैर्त्रुत्य रेल्वेचे अधिकारी यंत्रसामग्रीच्या सहाय्याने रेल्वेमार्ग खुला करण्यासाठी दिवस-रात्र मेहनत घेत होते. सोमवारी रेल्वेमार्ग खुला झाल्यानंतर ताशी दहा किलोमीटर वेगाने मालवाहू रेल्वेची चाचणी घेण्यात आली. त्यानंतर हा रेल्वेमार्ग वाहतुकीसाठी योग्य झाला असल्याचे नैर्त्रुत्य रेल्वेने घोषित केले. या मार्गावरून सध्या ताशी 20 किलोमीटर वेगाने केवळ मालवाहतूक करण्यास परवानगी आहे. त्यामुळे प्रवासी वाहतुकीसाठी अजून काही काळ वाट पहावी लागणार असण्याची शक्यता आहे, अशी माहिती नैर्त्रुत्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी मंजुनाथ कनमाडी यांनी दिली आहे.