प्रवास महागला, सात रुपयांनी वाढ : प्रवाशांच्या खिशाला कात्री
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव-खानापूर बस तिकीट दरात वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला कात्री लागली आहे. मागील आठ दिवसांपासून बेळगाव-खानापूर बस तिकीट दरात सात रुपयांची वाढ झाल्यामुळे प्रवाशांना अधिक पैसे मोजावे लागत आहेत.
बेळगाव-खानापूर मार्गावर एक्स्प्रेस बसचा तिकीट दर 30 वरून 37 रुपये झाला आहे. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱया प्रवाशांना सात रुपये जादा द्यावे लागणार आहेत. अगोदरच वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. त्यातच बेळगाव-खानापूर बसचा तिकीट दर वाढल्याने प्रवाशांना आर्थिक झळ सोसावी लागणार आहे.
दोन वर्षांपूर्वी बस तिकीट दरात 12 टक्क्मयांनी वाढ झाली होती. त्यानंतर कोरोनाकाळात परिवहनला मोठा फटका बसला होता. बेळगाव-खानापूर बस तिकीट दर कमी होता.
त्यामुळे परिवहनला नुकसान सोसावे लागत होते. या मार्गावरील एकूण उत्पन्न आणि तिकीट दराचा ताळमेळ बसत नव्हता. त्यामुळे नाईलाजास्तव परिवहनला बेळगाव-खानापूर एक्स्प्रेस बसच्या तिकीट दरात वाढ करावी लागली आहे.
केवळ बेळगाव-खानापूर एक्स्प्रेस बसच्या तिकीट दरात वाढ
बेळगाव-खानापूर एक्स्प्रेस बसच्या तिकीट दरात वाढ झाली आहे. बेळगाव-खानापूर वगळता इतर कोणत्याही बसचा तिकीट दर वाढलेला नाही. या मार्गावर मिळणारे उत्पन्न आणि तिकीट दर यात तफावत होती. त्यामुळे तिकीट दरात वाढ झाली आहे. प्रवाशांनी सहकार्य करावे.
– के. के. लमाणी (विभागीय संचार अधिकारी)