वार्ताहर/सांबरा
अखंड भारत हिंदू राष्ट्र व्हावा व संभाजीराव भिडे गुऊजी यांचा रायगडावरील 32 मण सुवर्ण सिंहासन संकल्प पूर्ण व्हावा यासाठी ज्योतिर्लिंगाला साकडे घालण्यासाठी बाळेकुंद्री खुर्द व मुतगे येथील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या दोन धारकऱ्यांनी बेळगाव ते रामेश्वरम सायकल प्रवास करण्याचा संकल्प केला आहे. बाळेकुंद्री खुर्द येथील धारकरी ऋतिक पाटील व मुतगे येथील धारकरी पवन पाटील यांनी दि. 21 रोजी बेळगाव-रामेश्वरम सायकल प्रवासाला प्रारंभ केला आहे. धारवाड, हुबळी, दावणगिरी, चित्रदुर्ग, तुमकुरमार्गे रविवार दि. 25 रोजी ते बेंगळूरला पोहोचले. दोघांचेही ठिकठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. त्यानंतर होसूर, सेल्लम, मदुराईमार्गे रामेश्वरमला पोहचणार आहेत व अखंड भारत हिंदू राष्ट्र व्हावा व रायगडावरील 32 मण सुवर्ण सिंहासनाचे काम लवकर पूर्ण व्हावे यासाठी ते ज्योतिर्लिंगाला साकडे घालणार आहेत. शेवटी कन्याकुमारी येथील रामसेतूला भेट देऊन सायकल प्रवासाची सांगता करणार आहेत. बेळगाव ते रामेश्वरम अंदाजे बाराशे किलोमीटर अंतर ते सायकल प्रवासाने पूर्ण करणार आहेत. त्यांच्या या संकल्पासाठी ग्रामस्थ व धारकऱ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या असून त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. मागील वर्षी हाच संकल्प करत दोघांनीही बेळगाव ते केदारनाथ 2200 किलोमीटरचे अंतर सायकलवरून केवळ 18 दिवसांत पूर्ण केले होते.